Republic Day: नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र राज्याने देदिप्यमान यश संपादन केले आहे. यंदाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या विविध राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाला सर्वोत्कृष्ट म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने या निकालाची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने द्वितीय, तर केरळ राज्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
काय होती यंदाची संकल्पना?
महाराष्ट्र राज्याने यंदा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून चित्ररथ साकारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला गणेशोत्सव कशा प्रकारे गती देतो, हे यातून मांडण्यात आले.
चित्ररथावर अष्टविनायकांच्या मनमोहक प्रतिकृती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि गणपती बाप्पाची भव्य मूर्ती अशा सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर आणि श्रीपाद भोंगाडे या कलाकारांच्या कल्पकतेतून हा चित्ररथ साकारला होता.
आर्थिक उलाढाल आणि आत्मनिर्भरतेचा संदेश
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सामाजिक एकोप्यासाठी केली होती, मात्र आज हा उत्सव महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा कणा बनला आहे. चित्ररथाच्या माध्यमातून खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले:
- रोजगार निर्मिती: गणेशोत्सवामुळे मूर्तीकार, सजावटकार, मंडप व्यावसायिक आणि फुलविक्रेते अशा लाखो हातांना रोजगार मिळतो.
- आर्थिक साखळी: उत्सवाच्या काळात राज्यात सुमारे ६० ते ७० लाख कोटी रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल होते, जी आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
- सांस्कृतिक वारसा: महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या चित्ररथाने केले.
३० चित्ररथांमध्ये महाराष्ट्राची सरशी
यंदाच्या संचलनात एकूण ३० चित्ररथांचा समावेश होता, ज्यामध्ये १७ राज्ये आणि १३ केंद्र सरकारच्या विभागांनी सहभाग घेतला होता. कलातज्ज्ञ आणि पद्म पुरस्कार विजेत्यांच्या समितीने विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करून महाराष्ट्राला सर्वोत्तम घोषित केले. ‘स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत’ या मुख्य थीमवर आधारित ही परेड पार पडली. महाराष्ट्राच्या या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.











