ZP Election Voting: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानात ग्रामीण मतदारांनी मोठा उत्साह दाखवला आहे. काही ठिकाणी ईव्हीएम बिघाड आणि वादावादीच्या किरकोळ घटना वगळता संपूर्ण राज्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्राथमिक अंदाजानुसार, ७० ते ७५ टक्के इतके मोठे मतदान झाले असून कोल्हापूर जिल्हा ८० टक्क्यांहून अधिक मतदानासह आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाची कठोर भूमिका
मतदान प्रक्रिया शांततेत होत असतानाच सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही केंद्रांवर लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत नेल्याचे प्रकार समोर आले. राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रत्नागिरीतील चिपळूणसह काही जिल्ह्यांत सुरुवातीला ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाले, मात्र प्रशासनाने तातडीने यंत्रे दुरुस्त करून मतदान सुरळीत केले.
नेत्यांची प्रतिष्ठा आणि सहानुभूतीचा फॅक्टर
या निवडणुकीत भाजप आपला क्रमांक एकचा दबदबा टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात फारसा आक्रमक सहभाग घेतला नसला तरी, त्यांना मिळणाऱ्या संभाव्य सहानुभूतीचा फायदा निकालात दिसून येईल का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय मतदानाची प्राथमिक टक्केवारी (अंदाज):
- छत्रपती संभाजीनगर: ७० टक्के
- कोल्हापूर: ८० टक्के (अपेक्षित)
- रायगड/परभणी: ६० टक्के
- लातूर/सिंधुदुर्ग: ५५ टक्के
- पुणे: ५४ टक्के
- सोलापूर: ५० टक्के
- सांगली/सातारा/धाराशिव: ४५-४७ टक्के
निकालाची उत्सुकता
जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समितीच्या १,४६२ जागांसाठी एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दोन तासांतच ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल.









