Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी चलो मुंबईनंतर आता नवी घोषणा दिली आहे. अंतरवाली सराटीतील घरी दैनिक नवाकाळशी बोलताना मनोज जरांगे यांनी पुढील टप्प्यांची माहिती उघड केली. जरांगे यांनी याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला.
ते म्हणाले की, इतिहासात मराठ्यांनी दिल्ली गाजवली. मी आता मराठ्यांना दिल्लीला न्यायचं आहे. पण लढण्यासाठी नाही, तर सोहळ्यासाठी. दिल्लीत देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील मराठ्यांना एकत्र करून सोहळा साजरा केला जाईल. पुढील वर्षातील सर्वांच्या सोयीचा तारीख नक्की केली जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करतानाचं छायाचित्र वापरत देवाभाऊ अभियान चालवणं गैर नसल्याचं जरांगे म्हणाले, मात्र, जर त्यांनी कागदावरची आश्वासनं प्रत्यक्षात आणली, तर मराठे स्वत:च देवाभाऊ अभियान चालवतील. वर्षा बंगल्याला गुलालात माखवतील, असंही जरांगेंनी बजावलं.
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या देवाभाऊ प्रतिमेचं नुकसान करतील, सावध राहिलं पाहिजे. मराठ्यांना दिलेले शब्द पाळले नाहीत, तर पुन्हा लढावं लागेल, असा इशारा जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला.
हे देखील वाचा – मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये १५३ कोटींची इमारत खरेदी केली