ST Revenue: महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची ने-आण करण्यापुरती मर्यादित न राहता, महामंडळाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन ठरणार आहे. एसटी महामंडळाने आपल्या अफाट जाहिरात क्षमतेचा वापर करून पुढील 5 वर्षात 250 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
जाहिरातींचे नवे जाळे आणि महसूल वृद्धी
एसटी महामंडळाच्या 310 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील 259 आगारे आणि 610 पेक्षा अधिक बसस्थानकांचा वापर आता जाहिरातींसाठी प्रभावीपणे केला जाईल.
सध्या एसटीच्या ताफ्यात 12 हजार बसेस असून दररोज सुमारे 55 लाख प्रवासी यातून प्रवास करतात. भविष्यात ही संख्या 1 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचण्याचे एसटी हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने जाहिरातदारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
निविदा प्रक्रिया आणि उत्पन्नात दुप्पट वाढ
महामंडळाने बसस्थानकांचा परिसर, बसेसचा आतील आणि बाहेरील भाग जाहिरातींसाठी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या एसटीला जाहिरातींतून वर्षाला साधारण 22 कोटी रुपये मिळतात, मात्र नवीन करारामुळे हे उत्पन्न आता थेट दुप्पट होणार आहे. जुन्या जाहिरातदारांचा कालावधी संपताच नवीन परवानाधारकांकडे हे काम सोपवण्यात येईल.
आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी पाऊल
एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे इतर मार्ग शोधणे काळाची गरज बनली आहे. तिकीटाव्यतिरिक्त मिळणाऱ्या या अवांतर महसुलामुळे एसटीला भविष्यात तोट्यातून बाहेर काढणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. गावागावांत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक फेरीत आता महसुलाची नवी गणिते मांडली जात आहेत.
हे देखील वाचा – Crude Oil Price Hike: युद्धाचा फटका सामान्यांना! पेट्रोल आणि डिझेलचे दर 200 रुपयांच्या पार जाणार का? जाणून घ्या










