MSRTC New Buses: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी ‘लालपरी’ आता कात टाकणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने यावर्षी ताफ्यात 8,300 नवीन बसेस समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासोबतच महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे.
सध्या एसटी महामंडळाला दररोज 1 ते 1.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाचा दररोजचा खर्च 34 ते 35 कोटी रुपये असून उत्पन्न केवळ 33 कोटी रुपये आहे. ही तूट भरून काढण्यासाठी बसची संख्या वाढवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
असा असेल नवीन बसेसचा ताफा
पहिल्या टप्प्यात दाखल होणाऱ्या 8,300 बसेसमध्ये विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल:
- राजमाता जिजाऊ साहेब बस: 55 आसनी क्षमतेच्या 3,000 सेमी-लक्झरी बसेस ताफ्यात येतील. या बसेस मार्च महिन्यापासून जास्त गर्दीच्या शहरी मार्गांवर धावणार आहेत.
- प्रमाणित बसेस: 5,000 साध्या बसेसची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून यामुळे ग्रामीण आणि शहरी कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
- मिडी बसेस: दुर्गम आणि आदिवासी भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी 100 मिडी बसेसची तरतूद करण्यात आली आहे.
- आधुनिक बसेस: खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी 200 सर्वसोयींनी युक्त आधुनिक बसेस सुरू केल्या जातील.
या नवीन बसेस रस्त्यावर आल्यानंतर दररोज 70 ते 75 लाख प्रवाशांना सेवा देणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दीर्घकालीन धोरण
राज्य सरकारने केवळ याच वर्षासाठी नव्हे तर आगामी काळात एसटीच्या ताफ्यात एकूण 20,000 ते 25,000 बसेस घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दीर्घकालीन योजनेला प्राथमिक मान्यता मिळाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “नवीन गाड्या आणि सुधारित सेवांमुळे लालपरी पुन्हा एकदा दिमाखात धावेल. या वर्षाच्या अखेरीस एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून बाहेर पडेल याची आम्हाला खात्री आहे.”










