Mumbai Pune Missing Link: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खंडाळा आणि लोणावळा दरम्यानच्या धोकादायक घाटाचा वळसा टाळणाऱ्या या नवीन मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, दोन्ही बाजूंच्या डेकचे शेवटच्या काही भागाचे काम शिल्लक असून, लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची चिन्हे आहेत.
प्रवासाचे अंतर आणि वेळ वाचणार
सुमारे 13.3 किलोमीटर लांबीचा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्याच्या 19.8 किलोमीटरच्या अत्यंत अवघड आणि अपघातप्रवण घाटातील प्रवासाला पर्याय ठरेल. या नवीन मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर जवळजवळ 6 किलोमीटरने कमी होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार आहे. जुन्या घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणे या नवीन मार्गामुळे पूर्णपणे बाद होतील, ज्यामुळे वाहनचालकांना अधिक चांगली दृश्यमानता आणि सुरक्षितता मिळेल.
टोलबाबत मोठा खुलासा
या नवीन मार्गामुळे टोलमध्ये मोठी वाढ होईल का, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार टोलमध्ये कोणतीही अचानक किंवा मोठी दरवाढ केली जाणार नाही.सध्याच्या टोल रचनेचा दर 5 वर्षांनी आढावा घेतला जाईल आणि पुढील बदल 2030 मध्ये अपेक्षित आहेत. यामुळे तूर्तास प्रवाशांच्या खिशावर जादा बोजा पडणार नाही.
सुरक्षेबाबत विशेष काळजी
हा मार्ग 1 मे पर्यंत लोकांसाठी खुला होण्याची शक्यता असली तरी, सुरक्षेबाबत काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय घाईने वाहतूक सुरू करू नये. बोर घाटातील मुसळधार पाऊस, धुके आणि हवेचा दाब लक्षात घेता, सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी वाहनांना परवानगी द्यावी आणि जड वाहनांवर बंदी घालावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
सध्या दररोज सुमारे 75,000 वाहने या एक्स्प्रेसवेवरून धावतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या 1,20,000 पर्यंत पोहोचते. या नवीन लिंकमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.












