मुंबई –मध्य रेल्वेवर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात (Train Accident)दोन रेल्वे गाडया एकमेकाला घासल्या नाहीत,असा निष्कर्ष चौकशी (investigating) समितीने काढला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल आज सादर केला.या अपघातात पाच प्रवाशांचा (passengers) मृत्यू झाला होता. तर नऊ प्रवासी जखमी झाले होते. दोन लोकल रेल्वे गाडा एकमेकांना धडकल्याने अपघात घडला असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार दोन्ही गाड्या एकमेकांना घासल्या नव्हत्या, तर दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल गेल्यामुळे (lost balance) ही दुर्घटना घडली.
अहवालात असे म्हटले आहे की, सीएसएमटीहून (Csmt)कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एक प्रवासी खांद्यावर बॅग घेऊन दरवाज्याजवळ उभा होता. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसते की त्याने हात बाहेर काढल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो गाडीतून खाली पडला. त्याचवेळी शेजारच्या ट्रॅकवरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाणारी दुसरी लोकल त्या ठिकाणी आली. तिच्या दरवाज्याजवळ उभे असलेले काही प्रवासी या अपघातात धडकून खाली पडले असावेत. दुर्घटनेच्या वेळी दोन्ही लोकल ट्रेनमधील अंतर केवळ ०.७५ मीटर (२.४६ फूट) इतके होते. या गाड्या सुमारे ७५ किमी प्रतितास वेगाने चालल्या होत्या. अशा वेगात दरवाज्याजवळ उभा असलेला प्रवासी जर बाहेर हात काढतो अथवा त्याचा तोल जातो, तर त्याला शेजारील गाडीच्या दिशेने फेकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गंभीर अपघात घडू शकतो.
दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल आठवडाभरात सादर होणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.