Nana Patole | ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम’, नाना पटोलेंच्या विधानाने नवा वाद, भाजपकडून जोरदार टीका

Nana Patole

Nana Patole on Operation Sindoor | काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मोहिमेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवले होते. ‘भारताने हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे ‘लहान मुलांचा संगणकावरील व्हिडीओ गेम’ होता’, असे वक्तव्य आता पटोले यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजपकडून देखील काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला जात आहे.

नाना पटोले यांचे नेमके विधान काय?

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक-दोनदा नव्हे, तर डझनभर वेळा धमकावले की, ‘तुम्ही युद्ध थांबवा, अन्यथा आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार बंद करू.’ ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले.”

पटोले पुढे म्हणाले, “भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात एक वक्तव्य केले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारताने आधी पाकिस्तानला सांगितले होते की ‘आम्ही अमुक ठिकाणे लक्ष्य करणार आहोत. तुम्ही तुमच्या लोकांना तिथून हटवा.’ याचा अर्थ असा की, ‘लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला होता’.”

चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका

नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) एक पोस्ट करून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले, “‘ऑपरेशन सिंदूर’ हा एक ‘कॉम्प्युटर खेळ’ असे आक्षेपार्ह विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी करून ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भारताच्या शत्रूंमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे केवळ आपल्या शूर जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचाअपमान नाही, तर संपूर्ण भारतीयांचाअपमान आहे. नाना पटोले हे असंवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्या या हास्यास्पद विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होतील, हे त्यांना कळत नाही.”

“नाना, ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेली धाडसी आणि शौर्यपूर्ण कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या मनात धडकी भरवणारी एक ज्वलंत शौर्यगाथा आहे! देशाच्या सैनिकांचे धाडस, दहशतवादाविरुद्ध केलेली कृती आणि भारतमातेच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष हा काँग्रेसला फक्त खेळ वाटतो का?”, असे बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांनी राहुल गांधींवरहीनिशाणा साधला. ते म्हणाले, “तुमचे नेते राहुल गांधी देखील परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चे पुरावे (Proof) मागून काँग्रेसने यापूर्वीच आपली नीच मानसिकता दाखवली आहे. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या!

नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे, असे नाना पटोलेंवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले.