Nashik Accident News: नाशिक जिल्ह्याlतील. दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर भागात शुक्रवारी रात्री उशिरा एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून हसत-खेळत घराकडे परतणाऱ्या दरगोडे कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव ‘इर्टिका’ कार अनियंत्रित होऊन पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळल्याने हा हाहाकार उडाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरीतील इंदोरे गावातील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब एका खासगी क्लासच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. कार्यक्रम आटोपून रात्री 10 वाजेच्या सुमारास सर्वजण आपल्या कारने (क्रमांक MH15-JS-1053) गावाकडे निघाले होते. शिवाजी नगर परिसरातील एका विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट विहिरीत जाऊन पडली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही.
रात्रीचा अंधार आणि बचाव कार्यात अडथळे
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र रात्रीचा काळोख आणि खोल विहिरीमुळे मदतीला मर्यादा येत होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले. मोठ्या शर्थीनंतर क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली. मात्र, दुर्दैवाने कारमधील लहान मुलांसह नऊही जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
गाव हादरले, मृतांमध्ये चिमुरड्यांची संख्या अधिक
या भीषण दुर्घटनेत 7 ते 14 वर्षे वयोगटातील 6 मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसर हळहळत आहे. सुनील दरगोडे (वय 32) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चिमुरड्यांचा यात अंत झाला. इंदोरे गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून पोलिसांनी या अपघाताचा सविस्तर तपास सुरू केला आहे.










