कोल्हापूर –मागील तीन दिवसांपासुन जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संततधारांमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते. काल रात्री १० वाजता नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, पंचगंगेची पाणी पातळी ३४.१० फुटांवर पोहचली होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ६१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नदी इशारा पातळी गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला.नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.