PM Modi on Maharashtra ZP Results: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशाचे पडसाद आता दिल्लीत उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले असून, हा विजय सुशासनाचा आणि विकासाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामीण महाराष्ट्राने पुन्हा एकदा महायुतीला दिलेला कौल हा राज्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
‘X’ वर आपली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील घवघवीत यशानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही जनतेने महायुतीला भक्कम कौल दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे सरकार हवे आहे, हे या निकालावरून सिद्ध झाले आहे.”
ग्रामीण आणि शहरी जनतेचा ‘गुड गव्हर्नन्स’ला पाठिंबा
या विजयामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीची लाट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण जनतेनेही केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांवर विश्वास दाखवला आहे. ‘सुशासन’ हाच विकासाचा मुख्य आधार असून जनता त्यालाच पसंती देत असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक
पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय मैदानात राबणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. “एनडीएच्या सुशासनाचा दृष्टिकोन आणि राज्य सरकारने केलेली ठोस विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच ग्रामीण बालेकिल्ल्यांमध्ये महायुतीला विजयाचा झेंडा फडकवता आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.









