Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वगळल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता या प्रकरणात उडी घेतली आहे.
या कृत्याचा जाहीर निषेध करत आंबेडकरांनी संबंधित महिला वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
“ही नीच मानसिकता!” – प्रकाश आंबेडकरांचा प्रहार
प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर अत्यंत कडक शब्दात भाष्य केले आहे. “भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या नीच मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो. माधवी जाधव यांनी जो धाडसी पवित्रा घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो,” असे ते म्हणाले. आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कायदेशीर कारवाईचा इशारा
प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवर बोलून पूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. यानंतर त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की: गिरीश महाजन यांनी केलेले कृत्य हे ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत मोडणारा गुन्हा आहे. वंचित बहुजन आघाडीची नाशिक पश्चिम कमिटी सध्या पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, तर मी स्वतः कायदेशीर मसुदा (ड्राफ्ट) तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल.
काय आहे नेमकं प्रकरण?
प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणानंतर गिरीश महाजन यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक माधवी जाधव यांनी मंत्र्यांना भर कार्यक्रमात जाब विचारला होता. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या धाडसी कृत्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणाला राजकीय वजन प्राप्त करून दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर अनावधानाने नाव राहिल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली असली, तरी प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकरी संघटना महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.









