Raj Thackeray Eknath Shinde Meet : राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कोलाहल शमल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी विशेष भेट झाली. निवडणुकीच्या निकालानंतर उभय नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, ही भेट कोणत्याही राजकीय समीकरणासाठी नसून पूर्णपणे नागरी समस्यांच्या निगडित असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
या भेटीमुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांत कमालीची अस्वस्थता आणि गदारोळ पाहायला मिळाला. या भेटीमागे काही मोठी राजकीय गणिते दडली आहेत का, अशा चर्चांना उधाण आले असतानाच, आता खुद्द राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत या संभ्रमावर पडदा टाकला आहे.
राजकीय गदारोळ आणि उलटसुलट चर्चा-
या दोन नेत्यांच्या भेटीची बातमी समोर आल्यापासून विविध तर्क मांडण्यास सुरुवात केली होती. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी या भेटीचे आनंदाने स्वागत केले. तर विरोधी पक्षांनी यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. या दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता. युतीची नवी समीकरणे जुळत आहेत की काय, अशा प्रश्नांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर, अधिकृत स्पष्टीकरण येणे अत्यंत आवश्यक बनले होते.
राज ठाकरेंचा सडेतोड खुलासा-
अखेर राज ठाकरे यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधून या भेटीमागील मूळ भूमिका विशद केली. “प्रत्येक भेटीमागे राजकीय स्वार्थ किंवा युतीचे गणित असतेच असे नाही,” असे सांगत त्यांनी या चर्चेतील हवा काढून घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भूमिकेतील स्पष्टता आणि नागरी प्रश्नांविषयी असलेली तळमळ व्यक्त केली. “राज्यातील राजकारणाचे स्वरूप आता बदलले आहे; निवडणुकांचा काळ संपला असून आता केवळ लोकहिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मूळ समस्यांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष-
शहरांमध्ये होणाऱ्या प्रचंड विकासकामांबाबत बोलताना राज ठाकरे यांनी वास्तववादी चित्र मांडले. ते म्हणाले की, “आपल्याकडे दर्जेदार रस्ते आणि उड्डाणपूल (फ्लायओव्हर्स) होणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या चकाचक विकासकामांच्या झगमगाटात आपण मूळ आणि पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या शहरांमध्ये ज्या गतीने विकास होत आहे, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना, तसेच मलाही वैयक्तिकरित्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे.” विकासाचा हा प्रवास नागरिकांसाठी सुखकर असावा, अडथळ्यांचा नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पार्किंगचा प्रश्न आणि प्रशासकीय तत्परता-
शहरांमधील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण असलेल्या ‘पार्किंग’च्या समस्येवर त्यांनी विशेष भर दिला. आजच्या काळात लोकांकडे एकापेक्षा जास्त वाहने आहेत, परंतु इमारतींमध्ये त्यांच्या पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी, वाहने रस्त्यावर उभी केली जातात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांच्या सूचनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने भूषण गगराणी यांसारख्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
संवादातून जनहिताचा मार्ग-
राजकारणातील कटुता बाजूला ठेवून जनहितासाठी सत्ताधाऱ्यांशी संवाद साधणे ही काळाची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. “आम्हाला जर लोकांसाठी काही विधायक कामे करून घ्यायची असतील, तर संबंधित नेत्यांची भेट घेणे अपरिहार्य आहे. प्रत्येक भेटीकडे किंवा संवादाकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर, याच नागरी प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या दोन्ही नेत्याच्या भेटीवर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या उद्देशाबाबत विचारणा केली, तेव्हा संजय राऊत यांनी अत्यंत तटस्थ भूमिका घेतली. ते म्हणाले की, “कोणता नेता कुणाला आणि कोणत्या कारणासाठी भेटतो, हा त्यांचा वैयक्तिक किंवा पक्षीय प्रश्न असू शकतो. आम्ही कोणाच्याही हालचालींवर लक्ष ठेवत नाही किंवा कोणाची हेरगिरी करत नाही. लोकशाहीत कोणालाही कोणाचीही भेट घेण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यावर कोणाचेही बंधन असू शकत नाही. त्यामुळे या भेटीबाबत अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास तो प्रश्न तुम्ही थेट राज ठाकरेंनाच विचारणे उचित ठरेल.
नरेश म्हस्के यांचा ‘पोटशूळ’ आणि हिंदुत्वाचा हुंकार-
राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला होता. “राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे काहींना ‘पोटशूळ’ उठला आहे,” अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी विरोधकांच्या अस्वस्थतेवर बोट ठेवले होते. हे दोन्ही नेते बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक असून, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी एकत्र येणे हा साहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे प्रतिपादन म्हस्के यांनी केले होते.
शीतल म्हात्रे यांचा खोचक टोला आणि कौटुंबिक राजकारण-
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी अधिक बोचरी टीका करत उद्धव ठाकरेंच्या हतबलतेवर प्रहार केला होता. “आधी पक्ष पळवला, मग बाप पळवला आणि आता काय तर भाऊ (राज ठाकरे) देखील पळवला,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली होती. या विधानाने ठाकरे कुटुंबातील अंतर्गत मतभेद आणि राजकीय एकाकीपणावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला होता.
कल्याण-डोंबिवलीतील अनपेक्षित युती आणि कृतज्ञता-
या भेटीच्या मुळाशी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनपेक्षित सत्तासमीकरणे असल्याचेही समोर आले होते. त्या निवडणुकीत भाजपासोबत संघर्ष सुरू असताना, मनसेने सर्व संकेत बाजूला ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. या मदतीबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले होते, तर राज ठाकरे यांनीही भविष्यात महापालिका सभागृहात सहकार्याचे आश्वासन दिले होते. या सुसंवादामुळेच उभय नेत्यांमध्ये भविष्यातील युतीची बीजे रोवली गेल्याचे मानले जात होते. मात्र आता या सगळ्या चर्चाना राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे.















