Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत आपली रोख ठोक भूमिका मुंबईकरांसमोर मांडली. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपली थेट अशी सडेतोड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांबाबत देखील भर सभेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. याचबरोबर रागावून किंवा नाराज होऊन ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांबाबतही राज ठाकरे यांनी महत्त्वाचे भाष्य केल्याचे समोर आले.
राज ठाकरे सांगतात की, मी २० वर्षांनी पहिल्यांदा युती केली. त्यामुळे या युतीच्या प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीट देण्यात आले नाही, बहुतेक जण नाराज झाले. काहींना वाटले दुसऱ्या पक्षात जावे, काही गोष्टी झाल्या आणि अजूनही होत आहेत. परंतु त्या आमच्या हातात नसतात. पण, त्यांना दुखवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तरी जे नाराज झाले असतील त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, अश्या शब्दात त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे.
Raj Thackeray: जे पक्ष सोडून गेले आहेत, ते परत येतील..
नाराज होऊन पक्ष सोडलेल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना राज ठाकरे सांगतात की, “जे गेले आहेत ते सुद्धा आपलेच आहेत. ते परत येतील. कारण आता जे आहेत, ते पुढे कुठे जातील याची खात्री नाही. त्यामुळे जे गेले आहेत, ते परत येतील. या सर्व गोष्टींमध्ये मी त्यांना अगदीच समजू शकतो”, अस देखील राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray: शिवाजी पार्कच्या आठवणींना दिला उजाळा
दरम्यान, राज ठाकरे ह्यांनी शिवाजी पार्कशी जोडलेल्या भावनिक आठवणींना देखील उजाळा दिला आहे. ते सांगतात “मी लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत या व्यासपीठावर अनेकदा आलो आहे. शिवसेनेची स्थापना देखील याच शिवतीर्थावर झाली. त्यावेळी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमची माँ या देखील इथे उपस्थित होत्या. आज मी आणि उद्धव एकत्र आलो आहोत, हे सगळे जर इथे हजर असते तर हा क्षण अधिक आनंददायी आणि भावनिक झाला असता. मात्र, मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी उभा राहिलेला हा लढा ते वरून नक्कीच पाहत असतील,” असे भावनिक व्यक्त देखील त्यांनी यावेळी केले.
Raj Thackeray: मुंबईवरील संकटामुळेच केली युती
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, “मी आणि उद्धव एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं हे भलं मोठं संकट. गेल्या अनेक वर्षांपासून मी सांगत आलोय की, मुंबईविरोधात कशा पद्धतीने डाव रचला जात आहे. हिंदी सक्तीचा विषय आला, तेव्हा मी आणि उद्धव दोघेही त्यावेळी कडाडलो. कारण कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. आणि तिथूनच आमच्या युतीला सुरवात झाल,” असे देखील त्यांनी म्हटले.









