Raj Thackeray : सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यावरून राज्यात बरच राजकारण सुद्धा सुरूय. अशातच आगामी काळात होणाऱ्या या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या वेळी राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करीत केंद्र-राज्य सरकार आणि अदानी-अंबानींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणतात सदोष मतदार याद्यावरून आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात. सत्ताधार्यांनी यावेळीही आखलेला डाव उधळला जाण्याच्या धास्तीमुळे सत्ताधाऱ्यांची चिडचिड होत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस मतदार यादीत घुसविण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांना टोला-
विरोधकच नव्हे सत्ताधारी पक्षाचे आमदारही मतदार यांद्यामध्ये घोळ असल्याचे सांगत असून काहींनी तर २०-२० हजार मतदार बाहेरून आणल्याचे मान्य देखील केले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना २३२ जागा मिळूनही राज्यात कुठेही विजयाचा जल्लोष झाला नाही असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
अटल सेतू हि योजना नक्की कोणासाठी?
’ आपण प्रगतीच्या आड येणारे माणूस नाही. पण जर मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल, तर खपवून घेतली जाणार नाही.’ तुम्हाला वाटत असेल हे रस्ते, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी आहेत. पण या सर्व सोयी सुविधा उद्योगपतींनी जमिनी घेतल्या आहेत, त्याच्यासाठी असून जिथे नजर पडेल ते सर्व आपल्याला पाहिजे अशी भूमिका काही उद्योगपतींनी घेतली आहे. दुर्दैवाने त्यांना आपली मराठी माणसेच मदत करत असल्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप देखील त्यांनी केले आहेत. राज यांच्या या वक्तव्यामुळे सामान्य जनतेत मात्र प्रचंड संभ्रमाच वातावरण आहे. राज यांनी या आधी या गोष्टी का स्पष्ट केल्या नाहीत असे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत.
केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता आहे आणि जिल्हा परिषदा, महापालिकाही हातात आल्या, तर त्यांना रानच मोकळे होईल. हे सर्व सहज नाही, तर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मोठा डाव आखला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
मनसे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर मतदार याद्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यात दुरुस्त्या झाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही, असा थेट इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. परंतु त्यांचं हे भाषण संभ्रमित करणार आहे . या आधीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी हि भूमिका स्पष्ट का केली नाही? राज्यातील विविध प्रकल्प, जमिनी अदानी, अंबानीच्या घशात घातल्या आहेत. ठाणे जिल्ह्यावर कब्जा केल्याशिवाय मुंबईला हात लावता येत नाही, म्हणून बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळनंतर आता संजय गांधी उद्यानातील झाडे तोडून, तेथील आदिवासींना हटवून ही जागा अदानीला देण्याचा घाट घातला जात आहे ह्या स्वरूपाचे गंभीर आरोप त्यांनी केले आहे.
पर्यटकांचे अत्यंत आवडते आणि बरीच हिरवळ असलेले ठिकाण म्हणजे संजय गांधी उद्यान. इकडची वस्ती तोडून आदिवासींना हटवून हि जागा अदानीला देणं म्हणजे तिथल्या नागरिकांवर अन्याय. राज ठाकरेंचे आरोप जर सिद्ध झाले तर या सामान्य जनतेने कुठे जायचं, ह्या कुटील राजकारणाच्या विळख्यात सामान्य अडकणार का ? असा सवाल सध्या प्रत्यक सामान्य माणसांच्या मनाला भेडसावत आहे.
हे देखील वाचा – Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? दरवर्षी दिवाळीलाच ते का केले जाते? वाचा