Home / महाराष्ट्र / Ram Navmi 2026 : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव: मानवी मूल्यांचा आणि अढळ श्रद्धेच महापर्व

Ram Navmi 2026 : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव: मानवी मूल्यांचा आणि अढळ श्रद्धेच महापर्व

Ram Navmi 2026 : भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध नवमी हा दिवस केवळ एक तिथी नसून, तो अधर्मावर धर्माच्या विजयाचा आणि...

By: Team Navakal
Ram Navmi 2026
Social + WhatsApp CTA

Ram Navmi 2026 : भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध नवमी हा दिवस केवळ एक तिथी नसून, तो अधर्मावर धर्माच्या विजयाचा आणि सत्याच्या पुनरुत्थानाचा मंगलमय प्रहर आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मानिमित्त साजरा केला जाणारा हा उत्सव ‘श्रीराम नवमी’ म्हणून जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या हृदयात आदराचे स्थान राखून आहे. हा सण मानवाला आदर्श जीवन जगण्याची दिशा देणारा आणि कौटुंबिक तथा सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारा एक महान संस्कार सोहळा आहे.

आध्यात्मिक महत्त्व आणि अवताराचा उद्देश-
पुराणांनुसार, त्रेतायुगात जेव्हा रावणासारख्या अधर्मी शक्तींचा सुळसुळाट झाला होता आणि पृथ्वीवरील सज्जन शक्ती त्रस्त झाल्या होत्या, तेव्हा असुरी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी अयोध्येचे राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी सातवा अवतार घेतला. दुपारी बरोबर १२ वाजता, जेव्हा सूर्य माथ्यावर असतो, अशा तेजस्वी मुहूर्तावर श्रीरामाचा जन्म झाला. ‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे स्वतःमध्ये; अर्थात जो स्वतःच्या प्रकाशात रममाण आहे आणि जो विश्वाला प्रकाश देतो, तोच ‘राम’ होय. रामनवमीचा हा दिवस आत्मिक शुद्धीचा आणि अंतर्मनातील दुर्गुणांचा नाश करण्याचा संदेश देतो.

आदर्श जीवनमूल्यांचा वारसा-
प्रभू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हटले जाते. त्यांनी आपल्या जीवनातून एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक ‘आदर्श राजा’ कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला. पितृवचनासाठी चौदा वर्षांचा वनवास पत्करणे असो किंवा प्रजेच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणे असो, रामाचे प्रत्येक पाऊल हे धर्मपालनाचे प्रतीक आहे. रामनवमीच्या दिवशी या गुणांचे स्मरण करणे, हेच या उत्सवाचे खरे फलित मानले जाते. ‘रामराज्य’ ही संकल्पना आजही सुशासनाचे सर्वोच्च मानदंडाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.

सांस्कृतिक आणि सामाजिक समन्वय-
रामनवमीचा उत्सव केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक एकोप्याचे माध्यम बनला आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः शिर्डीसारख्या ठिकाणी, या दिवसाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचीही जोड लाभलेली आहे. शिर्डीत १८९७ पासून सुरू झालेली उरूस आणि रामनवमीची एकत्रित परंपरा आजही अखंडित आहे. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, रथयात्रा आणि सामूहिक रामरक्षा पठण यांमुळे समाजात चैतन्य निर्माण होते.

उपासना आणि सात्विक उत्सव
या दिवशी भाविक उपवास करतात, सुंठवडा (प्रसाद) वाटप केला जातो आणि दुपारी १२ वाजता पाळणा गाऊन रामजन्माचा आनंद साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीची सांगताही याच दिवशी होते, ज्यामुळे या पर्वाचे महत्त्व द्विगुणित होते. घराघरांत होणारे रामायणाचे वाचन आणि “श्री राम जय राम जय जय राम” या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप वातावरणातील नकारात्मकता दूर करून सात्विकतेचा संचार करतो.
(टीप- हि बातमी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत या बातमीत आमचा कोणताही दावा नाही)

भक्तीचा मणिकांचन योग: बोरिवलीच्या काजूपाड्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न-
काल संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा अर्थात ‘श्रीरामनवमी’चा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. चैत्र शुद्ध नवमीच्या या पावन पर्वावर महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात रामलल्लाचा जयघोष करण्यात आला. श्रीरामनवमी आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांचे एक अतुट आणि आध्यात्मिक नाते आहे. शिर्डीमध्ये रामनवमीच्या दिवशी साईंची सेवा करण्याचे भाग्य लाभते, ही भावना उराशी बाळगून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डीत भाविकांच्या अलोट रांगा लागल्या होत्या. याच प्रमाणे अनेक ठिकाणी राम नवमीचा मोठ्या उत्साह पाहायला मिळाला. याच परंपरेचा वारसा जपत मुंबईतील बोरिवली उपनगरातही रामजन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला.

बोरिवलीतील काजूपाडा येथे ‘साई धाम’चा जल्लोष-
बोरिवलीतील काजूपाडा परिसरातील ‘साई धाम मित्र मंडळा’च्या वतीने काल रामनवमीचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाचे बहुतांश सदस्य हे ज्येष्ठ नागरिक आहेत. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या तक्रारींना बाजूला सारून, या ज्येष्ठ भक्तांनी ज्या उत्साहाने आणि श्रद्धेने साईंची व रामाची पूजा अर्चा केली, ते पाहून उपस्थित तरुण पिढी थक्क झाली.

श्रीरामनवमीच्या पवित्र पर्वावर ‘साई धाम मित्र मंडळा’ने आयोजित केलेला जन्मोत्सव सोहळा जेवढा भव्य होता, त्याहीपेक्षा त्यामागील पूर्वतयारीची गाथा अधिक प्रेरणादायी आहे. अवघ्या एका दिवसाचा हा सोहळा निर्विघ्नपणे आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी गेल्या एक महिन्यापासून सातत्याने परिश्रमांची पराकाष्ठा केली होती.

महिनभराचा नियोजनबद्ध संकल्प-
कोणताही मोठा उत्सव साजरा करताना त्यामागे सूक्ष्म नियोजनाची गरज असते. काजूपाड्यातील या ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळाने साधारण महिन्याभरापूर्वीच या उत्सवाचा श्रीगणेशा केला होता. वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादांना बाजूला सारून, या सदस्यांनी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित केले. उत्सवाचे स्वरूप कसे असावे, पालखीचा मार्ग, ढोल-ताशा पथकांचे निमंत्रण आणि भाविकांच्या सोयीसुविधा या सर्व बाबींसाठी या ज्येष्ठांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या या नियोजनातील तत्परतेमुळेच उत्सवाच्या दिवशी कुठेही गोंधळ उडाला नाही.

ज्येष्ठ सदस्यांचे वाखाणण्याजोगे श्रम-
या सोहळ्याचे सर्वात कौतुकास्पद पैलू म्हणजे मंडळातील सदस्यांची जिद्द. गेल्या तीस दिवसांपासून हे सदस्य केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकरीत्याही या उत्सवाशी एकरूप झाले होते. “साईंची सेवा हीच आमची संजीवनी आहे,” अशा पवित्र भावनेतून त्यांनी प्रत्येक कामात स्वतःचा सहभाग नोंदवला. एका दिवसाच्या आनंदासाठी महिन्याभराचा घाम गाळण्याची त्यांची ही वृत्ती आजच्या तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभासारखी ठरली आहे.

पालख्या आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला-
या उत्सवाच्या निमित्ताने काजूपाडा परिसरात एका आगळ्यावेगळ्या शोभेची अनुभूती येत होती. विविध भागांतून आलेल्या सुशोभित पालख्या आणि पारंपारिक वेशभूषेतील ढोल-ताशा पथके हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि जय श्रीराम व ओम साई रामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पालखीतील प्रभू रामचंद्रांच्या आणि साईंच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या