सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले; रोहिणी खडसेंची टीका

Rohini khadse criticized mahayuti government

मुंबई – शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar Faction) नेत्या रोहिणी खडसे यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्या प्रतिमेला गाजरांचा हार घातला.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, सरकारला सत्तेवर येऊन सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, पिकाला हमीभाव मिळाला नाही आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची आर्थिक मदतही मिळाली नाही. सरकारने आश्वासनांचे केवळ गाजर दाखवले. म्हणून गाजरांचा हार घालून सरकार या सरकारचा सत्कार केला. त्यांना या गाजरांना बघून तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण होईल.

त्या पुढे म्हणाल्या, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सातबाऱा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. अनेक ठिकाणी आत्महत्या होत आहेत. कर्जमाफीची केवळ वाट पाहिली जात आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सरकारने यावर निर्णय घ्यावा.