Rohit Pawar : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठे राजकीय वाकयुद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी थेट काँग्रेसला लक्ष्य करत, त्यांनी भाजपला मदत केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
या आरोपांनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली असून, हा वाद आता पुराव्यांच्या लढाईपर्यंत पोहोचला आहे.
नेमका वाद काय?
जामखेड पालिकेत रोहित पवार यांचे वर्चस्व मोडीत काढत भाजप नेते राम शिंदे यांनी विजय मिळवला आहे. या पराभवानंतर रोहित पवारांनी आरोप केला की, काँग्रेसने चक्क भाजपच्या उमेदवारांना आपल्या तिकिटावर उभे करून त्यांना निवडून आणण्यास मदत केली. “काँग्रेस ही भाजपची बी-टीम म्हणून काम करत आहे,” असे म्हणत त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मा. थोरात साहेब आपला इंटरव्ह्यू बघितला.. आपल्याविषयी काहीही तक्रार नाही, कायमच आदरच आहे, पण ज्यांनी माझ्याविरोधात प्रा. राम शिंदे यांचा प्रचार केला त्यांनाच काँग्रेसने पदं दिली. त्यांचे हे फोटो आपण आवर्जून बघा.. यांचे आपल्यासोबत कमी पण भाजप नेत्यांसोबतच अधिक फोटो आहेत. शिवाय… pic.twitter.com/Zld6wduXrn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2025
रोहित पवारांनी सादर केले फोटो
बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांना सबुरीचा सल्ला दिल्यावर, रोहित पवारांनी आपल्या एक्स (X) खात्यावर 8 फोटो शेअर करून पलटवार केला. त्यांनी म्हटले की, “थोरातसाहेब, आपल्याबद्दल आदर आहे, पण माझ्याविरोधात राम शिंदे यांचा प्रचार करणाऱ्यांनाच काँग्रेसने पदे दिली आहेत. काँग्रेसने ज्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तो भाजप आमदाराचा कार्यकर्ता आहे.” या फोटोंमध्ये काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजप नेत्यांसोबत दिसत असल्याचा दावा पवारांनी केला आहे. दिल्लीत राहुल गांधी भाजपशी दोन हात करत असताना, गल्लीत मात्र काँग्रेस भाजपच्या हातात हात घालत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी पवारांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले. थोरात म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवारांबद्दल नाराजी होती. मी त्यांना वारंवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निवडणुकीत काहीवेळा तडजोड करावी लागते, पण ती त्यांनी केली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णय घेतले.”









