Rohit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघात प्रकरणाला आता संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याप्रकरणी ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालय’ (DGCA) आणि विमान कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांची मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास स्पष्ट नकार दिल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, रोहित पवार यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
आधी संमती, मग नकार; नेमका कोणाचा दबाव?
पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सुरुवातीला पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास तयार झाले होते. माझे जबाब नोंदवण्यासाठी संगणकही (लॅपटॉप) आणण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हस्तक्षेप केला आणि एफआयआर नोंदवण्यास मनाई केली.” पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंडे आणि रोहित पवार यांच्यात यावेळी मोठी वादावादी झाली. “तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही गुन्हा नोंदवणार नाही,” अशा शब्दांत उपायुक्तांनी ठणकावल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यावरून त्यांनी सवाल उपस्थित केला की, ऐनवेळी कोणाचा फोन आल्यामुळे पोलिसांनी आपली भूमिका बदलली?
कायद्याचा आधार आणि भेदभावाचा आरोप
रोहित पवार यांनी नवीन फौजदारी कायद्याचा (PNS) संदर्भ देत हा गुन्हा दखलपात्र असल्याचे वकिलांमार्फत पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. “दिल्लीत एखाद्या कार्यकर्त्याने निषेध म्हणून शर्ट काढला तर तात्काळ गुन्हे दाखल होतात, मग महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू होऊनही एफआयआर का नोंदवला जात नाही? अजितदादांच्या बाबतीत हा वेगळा न्याय का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीच्या केवळ ५ विमानांवर कारवाई करणे ही केवळ डोळेपुसणी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सत्ताधारी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेमुळे आता सत्तेत असलेले नेते आणि अजित पवार यांच्या पक्षाचे इतर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचे?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच, पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार या न्यायासाठी लढत असताना अधिकार पदावर असलेले लोक गप्प का आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबईत पोलिसांनी दाद न दिल्याने आता या आमदारांनी आपली लढाई बारामतीकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळाचा परिसर येतो, तिथे उद्या सकाळी जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाचा पेच आता अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.










