Sanjay Raut On PM Modi : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदींवर हल्ला होण्याची सुतराम शक्यता नसल्याचा दावा करत, त्यांनी मोदींच्या कार्यशैलीवर खोचक टिप्पणी केली. “पंतप्रधानांनी अशी कोणती क्रांती केली आहे की लोक त्यांच्यावर हल्ला करतील? ते तर अत्यंत सामान्य जीवन जगत असून केवळ सत्तासुखाचा आनंद घेत आहेत,” अशा शब्दांत राऊतांनी मोदींच्या परदेश दौऱ्यांचाही समाचार घेतला.
सुरक्षेच्या मुद्द्यावरून टोलेबाजी-
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच संसदेत एक खळबळजनक विधान केले होते. “संसदेत काही अघटित घडण्याची शक्यता असल्याने मी पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली होती,” असे बिर्ला यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, आजच्या घडीला जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती जर कोणी असेल, तर ते भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक कडक आणि अद्ययावत आहे. इतकी अभेद्य सुरक्षा असतानाही त्यांना असुरक्षित का वाटते, हा संशोधनाचा विषय असल्याचे राऊत म्हणाले.
ऐतिहासिक संदर्भाने साधला निशाणा
राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या बलिदानाचा संदर्भ देत मोदींच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “इंदिरा गांधींनी देशाच्या अखंडतेसाठी खलिस्तानी अतिरेक्यांशी संघर्ष केला, तर राजीव गांधींनी श्रीलंकेतील शांततेसाठी आणि देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतले. या नेत्यांनी ठोस पावले उचलली होती, म्हणून त्यांना शत्रू होते. मात्र, विद्यमान पंतप्रधानांनी अशी कोणती क्रांतिकारी कृती केली आहे ज्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण व्हावा? ते केवळ परदेश दौरे करत आहेत आणि विशेष विमानातून फिरून आपल्या पदाचा आनंद घेत आहेत.”
नारायण राणे आणि किरीट सोमय्यांवर प्रहार-
पंतप्रधानांवरील टीकेसोबतच राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती दिली. राणे यांनी शिवसेनेतील पदवाटपाबाबत केलेले दावे धादांत खोटे असल्याचे सांगत, पक्षात कोणाला कोणते पद द्यायचे हा अधिकार केवळ शिवसेनाप्रमुखांचाच असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख ‘महात्मा’ असा उपरोधिकपणे करत राऊत यांनी न्यायालयातील प्रकरणावरही भाष्य केले. सोमय्या यांनी दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपले युक्तिवाद मांडले असून, आम्ही आमची बाजू खंबीरपणे लावून धरली असल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.









