Sanjay Raut : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित दिसले आहेत. काँग्रेसकडून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर टीका होत असतानाच, शरद पवार आणि गौतम अदानी यांची एकत्र उपस्थिती चर्चांना नव्या उधाणास कारणीभूत ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला असून, हा मुद्दा सामाजिक आणि राजकीय वातावरणात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
संजय राऊत यांनी या प्रसंगी सांगितले की, मुंबईवर पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली ज्या पद्धतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला त्यांचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे. ते उद्योगपती आहेत. पण गौतम अदानींसारखा हव्यास इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचे दिसून येत नाही असे देखील ते म्हणाले. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत, पण; ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक असल्याची जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
संजय राऊत यांनी सांगितले की, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नसून कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा तिथे उपस्थित असतील तर तो त्यांचा अगदीच व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
हे देखील वाचा – Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ मधून अक्षय खन्नाची हकालपट्टी! निर्मात्याचा संताप अन् कायदेशीर नोटीस; ‘हा’ दमदार अभिनेता घेणार जागा









