मुंबई – BJP MLA राणा जगजितसिंह पाटीलांच्या आक्षेपामुळे Finance Minister Ajit Pawar यांनी धाराशिव जिल्ह्याचा निधी रोखला, असा आरोप शिंदे गटाचे आमदार आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. त्यांनी याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे निधीबाबत शिंदे गटाची पुन्हा एकदा नाराजी उघड झाली आहे.
धाराशिवचे तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या काळात अजित पवारांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या विकास निधीला स्थगिती दिली होती. सरकार बदलले तरी त्यावरील स्थगिती उठली नसल्याने निधीअभावी कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे स्थगिती मागे घेण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र सरनाईक यांनी फडणवीसांना दिले आहे.
याबाबत सरनाईक म्हणाले की, मी धाराशिवचा पालकमंत्री आहे तरीही निधी अभावी कामे करता येत नाहीत. जिल्ह्यातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. यामुळे मी दुःखी आहे. मी माझी वेदना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. २०२४-२०२५ मधील उर्वरित निधीच्या वितरणास सर्व सदस्यांची मंजुरी होती. मात्र, भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे काही आक्षेप नोंदवले. यामुळे निधी रोखण्यात आला. त्यांनी निधीविषयी माझ्याशी कोणताही संवाद साधला नाही किंवा मी साधलेल्या संवादाला प्रतिसादही दिला नाही. याबाबत अनेक बैठक झाल्या. पण कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी कामे रखडली आहेत.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रताप सरनाईक यांचे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, जिल्हा नियोजन आराखड्यातील कामांमध्ये गंभीर अनियमितता असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यानंतर निधी रोखण्यात आला. त्यावर वरिष्ठ काय तो निर्णय घेतील.