Shiv sena and bjp – मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे सेना व भाजपाच्या (Shiv sena and bjp) जागावाटपाचा तिढा सुटला आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत याची घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईत अजित पवार गट स्वतंत्र लढणार आहे असे आताचे चित्र आहे. मात्र मुंबईतही अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढण्याबाबतही अजून चर्चा सुरू आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यावेळी 200 जागांवर एकमत झाले. आता फक्त 27 जागांचा मुद्दा बाकी असून, त्यावर चर्चा करून उद्याच घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. दोन्ही पक्षांतील नाराजांना गाफील ठेवण्यासाठी तिकीट वाटपाबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली आहे. भाजपाची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल असे सांगण्यात येते.
भाजपाने 140 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 87 जागा मिळणार आहेत. यासोबतच, रिपब्लिकन पक्षाला (आठवले) भाजपाच्या कोट्यातून काही जागा दिल्या जाणार आहेत. मात्र त्यांना भाजपाच्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या. सुरुवातीला भाजपाला 150 जागा लढवण्याची इच्छा होती. मात्रचर्चेअंती झालेल्या समझोत्यानुसार भाजपा 140 आणि 87 हा फॉर्म्युला ठरला. कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर आपलाच बसवायचा, असा भाजपाने चंग बांधला असून, त्यासाठी थोडी नरमाई घेत शिंदे शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडण्याची तयारी दर्शवली.
दुसरीकडे तिकीट वाटपाबाबत फैसला करण्यासाठी शिवसेनेच्या कोअर कमिटीची आज दुपारी बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा भेटणार असून, त्यावेळी 4-5 जागा आणखी सोडाव्यात असा आग्रह शिवसेनेकडून धरला जाऊ शकतो. उद्या सकाळी जागावाटपाबाबत सविस्तर माहिती दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषदेत देतील अशी अपेक्षा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमची महायुती आधीच आहे, आम्हाला घोषणेची गरज नाही.
मुंबई, ठाणे, वसई-विरार
राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
मुंबई- अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या मागे ठामपणे उभे राहत मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भाईंदर, अमरावती, नाशिक, सोलापूर महापालिकेतही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरू असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुरुवातीपासूनच दूर ठेवले. भाजपाने नवाब मलिक यांना आक्षेप घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे शरद पवार गट मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत युतीबाबत चर्चा करीत आहे. ही युती झाली नाही तर अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी हे मुंबईत एकत्र लढू शकतात.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा-
नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना









