Sharad Pawar : देशातील राज्यसभेच्या रिक्त होणार्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या खासदारकीचीही मुदत संपत आहे. मात्र आता त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी पाठिंबा देण्यास काँग्रेस आणि उबाठा या मित्रपक्षांनीच विरोध केला आहे.महाविकास आघाडीकडील आमदारांच्या संख्याबळानुसार केवळ एकच उमेदवार राज्यसभेवर निवडला जाऊ शकतो. ही जागा शरद पवार यांना देण्यास काँग्रेस आणि उबाठा या मविआतील दोन्ही पक्षांनी दोन कारणांसाठी विरोध केला आहे. शरद पवार वयोवृद्ध म्हणजे 85 वर्षांचे आहेत. त्यांची तब्येतही अलिकडे ठीक नसते. शिवाय राष्ट्र्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाल्यास शरद पवार हे भाजपाकडे जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे,रोटेशननुसार ही जागा आपल्याला मिळायला हवी अशी उबाठाची मागणी आहे.
शरद पवार यांनी आपण राज्यसभेवर खासदार होण्यासाठी इच्छुक असल्याचे स्वतः सांगितले नाही. तरी उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आणले होते. शरद पवार ज्येष्ठ नेते असल्याने ते राज्यसभेवर जाणार असल्यास उबाठा आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात उबाठाचाच शरद पवार यांच्या नावाला विरोध असल्याचे आज स्पष्ट झाले.
काँग्रेसच्या मुंबईत पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून पवारांच्या नावाला नापसंती दाखवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. विलीनीकरण झाल्यास शरद पवार भाजपाकडे जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा लक्षात घेऊन शरद पवारांना संधी देऊ नये, त्याऐवजी नव्या चेहर्याला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश लक्षात घेऊन काँग्रेसने स्वतःच्या उमेदवारासाठी आग्रह धरावा, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शरद पवारांचे वाढते वय आणि प्रकृती लक्षात घेता ते पुन्हा राज्यसभेवर जाण्यास तयार होतील का, याबद्दलही काँग्रेस नेत्यांना शंका असून त्यांनी नकार दिल्यास आघाडीला सर्वमान्य आणि तडजोडीचा उमेदवार शोधावा लागेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. आज यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, राज्यसभेसाठी निर्णय घेण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी. याबाबतीत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल.
दुसरीकडे उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे आज म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. मात्र आकडेवारी आणि रोटेशनप्रमाणे ही जागा आमचीच आहे. (शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचीही मुदत संपत आहे) त्यानुसार चर्चा होईल. सध्याचे संख्याबळ पाहिले तर भाजपाकडे 131 आमदार आहेत. शिंदेसेनेकडे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 40, उबाठाकडे 20, काँग्रेसकडे 16, शरद पवार गटाकडे 10 आणि अपक्ष व इतर मिळून 12 आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. मतांच्या गणितानुसार राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत. यानुसार भाजपाचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीच्या एक उमेदवाराची निवड होऊ शकते. मात्र त्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे.
——————————————————————————————————————–















