Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा असा शेवट होईल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब बारामतीमध्ये दाखल झाले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या दुर्घटनेचे राजकारण करू नका, अशी कळकळीची विनंती केली आहे.
महाराष्ट्र आज एका अशा कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे, ज्याच्यात त्वरित निर्णय घेण्याची मोठी शक्ती होती. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही, पण नियतीच्या पुढे कोणाचेही चालत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय आरोपांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण
अजित पवारांच्या अपघातावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशीची मागणी केली होती. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी ही घटना केवळ एक अपघात असल्याचे स्पष्ट केले.
या मृत्यूच्या यातना संपूर्ण महाराष्ट्राला आणि आम्हाला आहेत, त्यामुळे कृपया यात राजकारण आणू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या संकटकाळात सर्वांनी संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला संताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरून होत असलेल्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी स्वतः ही घटना अपघात असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही काही नेते या निमित्ताने संकुचित राजकारण करत असल्याचे फडणवीस म्हणाले. ममता बॅनर्जी या निमित्ताने अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत, याचे दुःख वाटते, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
बारामती विमानतळावर अश्रूंचा बांध फुटला
अपघाताची बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हेलिकॉप्टरने तातडीने बारामतीमध्ये पोहोचले. विमानतळावर शरद पवार यांचे जुने सहकारी विठ्ठल मणियार यांना पाहताच सुप्रिया सुळे यांना आपले रडू आवरता आले नाही. त्यांनी मणियार यांची गळाभेट घेतली आणि “तो सर्वांचा लाडका होता” अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी शरद पवार हे देखील कमालीचे भावूक झाले होते, त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या ठिकाणची माहिती घेतली. पवार कुटुंबीयांचा हा विलाप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.









