Shinde Sena - मुंबई पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपा महापौर पदावर कुणाला बसविणार अशी चर्चा आज सकाळपर्यंत सुरू होती. मात्र सूर्य माथ्यावर आला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्या फोडाफोडीची कुजबूज सुरू झाली. याचे कारण म्हणजे शिंदे सेनेचे सर्वच्या सर्व 29 नगरसेवक पुढचे काही दिवस मुंबईत पंचतारांकित ताज लॅण्डस एण्ड हॉटेलात ( taj lands end hotel) बंदिस्त राहणार असल्याचे वृत्त त्सुनामीसारखे पसरले आणि राजकीय भूकंप होईल अशी चर्चा सुरू झाली. त्यातच उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल असे विधान केले. त्यावरून देवा म्हणजे देवाभाऊ असा तर्क लावून आकडेमोड सुरू झाली. आणखी भर म्हणून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत.
पालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपाने मुंबईत लगेचच जल्लोष साजरा केला. आज सकाळी भाजपाने पुन्हा पुण्यात जल्लोष केला. पण शिंदे सेना शांत राहिली. अजित पवार बारामतीत लपून बसले. मनसे नगरसेवकांचे राज ठाकरेंच्या घरी स्वागत झाले तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्व नगरसेवकांचेे कौतुक करून आभार मानले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जसा सन्नाटा होता तसाच यावेळी पुन्हा होता. सकाळी महापौर निवडीची चर्चा सुरू होती. मात्र महापौर आरक्षण निघाले नसल्याने आणखी काही दिवस ही निवड होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले.
अशा वातावरणात अचानकपणे मुंबईत विजयी झालेले शिंदे सेनेचे एकेक नगरसेवक बांद्रा येथील पंचतारांकित ताज लॅण्डस एन्ड हॉटेलात येऊ लागले. शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे पुष्पगुच्छ देऊन प्रत्येकाचे स्वागत करीत होत्या. या नगरसेवकांची बैठक बोलावली असून, सायंकाळी एकनाथ शिंदे त्यांना संबोधित करणार असे सांगितले जात होते. तेवढ्यात वृत्त आले की, हे सर्व 29 नगरसेवक पुढचे किमान तीन दिवस हॉटेलातच बंदिस्त राहणार आहेत. हे वृत्त फुटताच शिंदे सेनेचे गुवाहाटीला पलायन आणि तिथून शिवसेना उभी फोडून मुंबईत आगमन हा इतिहास जागृत झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांना कुणाची भीती आहे यावर उहापोह सुरू झाला. एकनाथ शिंदेंचे 29 आमदार आहेत ते सर्व दुसर्या पक्षात जाण्याची भीती आहे की, महापौर मतदानात हे आमदार दुसर्या पक्षाला म्हणजेच उबाठा, मनसेच्या महापौर उमेदवाराला मतदान करण्याचे भय आहे. मुंबईत 227 नगरसेवकांत 114 हा बहुमताचा आकडा आहे.
भाजपा (89) आणि शिंदे (29) मिळून 118 होतात. म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा केवळ 4 जास्त आहेत. जर शिंदे सेनेचे 14 नगरसेवक फोडून उभी फूट पाडली तर उबाठा (65), काँग्रेस (24), मनसे (6), एमआयएम (8) आणि शिंदे गट (14) मिळून 117 होतात. असे झाले तर हे बहुमत होऊन उबाठाचा महापौर निवडून येऊ शकतो. याचीच शिंदे सेनेला धास्ती असल्याने शिंदेंच्या सर्व 29 नगरसेवकांचा ताज लॅण्डस एण्ड हॉटेलात बंदोबस्त केला आहे का? हा सवाल विचारला जात होता. भाजपा (89), उबाठा (65), मनसे (6), अजित पवार गट (3), शरद पवार गट (1) यांनी एकत्र येऊन 164 चा आकडा गाठला तर आणखी मोठा धक्का बसेल.
पुढील काही दिवसांत काय घडते याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट म्हटले की, आम्ही आणि शिंदे गट एकत्र बसून सर्व योग्य तर्हेने ठरवू. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी ठाम वक्तव्य केले की, देवाभाऊंच्या मनात आहे तोच महापौर होणार आहे. पण तो उबाठाचा नक्कीच असणार नाही. शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही ही शक्यता फेटाळत आपली सत्ता गेली हे उबाठाच्या पचनी पडत नाही असे म्हटले. पण पहाटेचा शपथविधी आणि गुवाहाटीची वारी बघितलेला महाराष्ट्र या शक्यतेबाबत जोरदार चर्चा करीतच आहे.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
मुंबई देशाचा अभिमान!”; महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट
भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची २० जानेवारीला निवड होणार









