Supriya Sule : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. मात्र, या दुर्घटनेबाबत आता राजकीय वर्तुळातून गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा दावा केल्यानंतर, आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
जनभावनेचा आदर करत सत्याचा उलगडा व्हावा: सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर आपली अधिकृत भूमिका मांडताना तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल आहे. मात्र, समाजमाध्यमांतून या घटनेबद्दल ज्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत, त्या पाहता जनभावना अतिशय तीव्र आहेत. आमदार रोहित पवार अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने काही गंभीर तथ्ये आणि मुद्दे समोर आणत आहेत. जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे मिळणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे.”
सुळे यांनी पुढे नमूद केले की, तपासाला होणारा विलंब लोकांची अस्वस्थता वाढवत असून, या घटनेतील सत्य पारदर्शकपणे जगासमोर येणे अत्यंत आवश्यक आहे. सत्याचा अपलाप होऊ नये, हीच संपूर्ण महाराष्ट्राची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांच्या जिवाला धोका? सुरक्षेची मागणी
आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन या अपघातात वैमानिकाचा (पायलट) वापर करून घातपात घडवण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. “रोहित पवारांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले आहे, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी आणि त्यांना तातडीने आवश्यक सुरक्षा पुरवावी,” अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
परिवारातूनही तपासावर प्रश्नचिन्ह
रोहित पवारांनंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही या प्रकरणाच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त केले आहे. विमान अपघाताचा तपास निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पवारांच्या कुटुंबातूनच आता तपासाबाबत शंका उपस्थित होत असल्याने तपास यंत्रणांवरील दबाव वाढला आहे.
अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा अपघाती मृत्यू हा केवळ राजकारणाचा भाग नसून, ती राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा तपास कोणत्या दिशेला जातो आणि यात काही नवीन तथ्ये बाहेर येतात का, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.














