Ajit Pawar- पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजही भाष्य केले. ते म्हणाले की, 2008-09 मध्ये माझ्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. आज पंधरा-सोळा वर्षे झाली, पण त्या घोटाळ्याचे काहीही पुरावे सापडले नाहीत. मी निर्दोष ठरलो. मात्र माझी बदनामी झाली. निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप होतात. आता तसेच आरोप आहेत. परंतु मी काहीही चुकीचे केलेले नाही. अजित पवार बिनधास्त आहेत. हे आरोपही टिकणार नाहीत, लोक विसरतील आणि समिती चौकशीत आपण निर्दोष ठरू, अशी त्यांना या प्रकरणातही खात्री आहे.
अजित पवार आज बारामतीत आले होते. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणावरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले की, काही गोष्टींबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसार सर्व वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाईल. एक रुपयाचाही व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो, ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे. रजिस्ट्रार ऑफिसच्या लोकांनी नोंदणी कशी केली, चुकीचे काम कसे केले याबाबत तपासात समजेल. मुख्यमंत्र्यांनी त्या कमिटीवर चांगले अधिकारी नेमले आहेत. ते योग्य तपास करतील.
ते पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरू होतात. तुम्हाला आठवत असेल तर 2008 -09 मध्ये माझ्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्षे झाली. त्यामध्ये कोणीही काहीही पुरावे देऊ शकले नाहीत. पण आमची बदनामी झाली. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामे करायची. पारदर्शकता कशी राहील ते बघायचे. नियमाला धरून सगळे करायचे. चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचे काहीतरी बाहेर निघते. पारदर्शकपणे काम करत असताना केवळ राजकीय हेतूने बदनामी केली जाते. एकदा आरोप केले तर ठीक आहे. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच चालवले जातात. माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ दिलेली नाही. पुन्हा सांगतो की, माझ्या नावाचा वापर करून माझे जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी असतील, त्यांनी नियमाला धरून नसेल असे काम सांगितले तर संबंधित अधिकार्याने ते करता कामा नये. क्लास वन, टू आणि सर्व अधिकारी, आयएएस,आयपीएस अधिकार्यांना त्यांनी नियमात न बसणारे काम करू नये, असे आवाहन मी करतो.
जय पवार लढणार नाहीत
अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर असे काही होणार नाही, असे त्रोटक उत्तर त्यांनी दिले.
हे देखील वाचा –
मुंबईत भाजपाचा प्रचार सुरू ! घरोघरी जाऊन गार्हाणी ऐकणार
२०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला
लालूंचा दुरावलेला पुत्र तेजप्रतापला केंद्र सरकारची वाय प्लस सुरक्षा









