BJP campaign songs :मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस शिल्लक असताना भाजपाला धक्का बसला आहे. संगीतकार अवधूत गुप्ते आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील भाजपाचे प्रचारगीत (BJP campaign songs)राज्य निवडणूक आयोगाने नाकारले. या गीतामध्ये ‘भगवा’ शब्द वापरण्यात आल्याने आयोगाने आक्षेप घेत प्रचारासाठी या गीताच्या वापरास परवानगी नाकारली. या निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, निवडणूक आचारसंहितेनुसार धार्मिक किंवा भावनिक संदर्भ असलेले शब्द प्रचारात वापरण्यास मनाई आहे. अशा शब्दांमुळे मतदारांवर विशिष्ट धार्मिक किंवा भावनिक प्रभाव पडण्याची शक्यता असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा येऊ शकते. यापूर्वीही विविध पक्षांच्या प्रचारगीतांवर आणि जाहिरातींवर आयोगाने याच कारणाने आक्षेप घेतले आहेत. 2024 मध्ये उबाठाच्या प्रचारगीतामधील वरदान दिले शौर्याचे, आई भवानीने आम्हास, खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास या ओळींवर आक्षेप नोंदवून आयोगाने प्रचारगीत नाकारले होते. शिंदे गटाच्या प्रचारगीतातील ‘जय भवानी’ आणि ‘रामराज्य’ या शब्दांवरही आयोगाने आक्षेप घेत हे शब्द वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयोगाच्या सूचनेनुसार हे शब्द हटवून सुधारित प्रचारगीत आणि जाहिराती सादर केल्यानंतर त्यांना मान्यता देण्यात आली होती.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही यापूर्वी जाहिरातीत बदल करावा लागला होता. मौलाना आझाद महामंडळाच्या कामाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत घराच्या भिंतीवर ‘मक्का-मदिना’ आणि ‘786’ ही धार्मिक चिन्हे दाखवण्यात आली होती. या धार्मिक चिन्हांवर आक्षेप घेत आयोगाने संबंधित भाग वगळून सुधारित जाहिरात सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सुधारित जाहिरातीला मान्यता मिळाल्याची माहिती आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जाहिरात आणि प्रचारगीतांमध्ये धार्मिक शब्द, धर्माशी संबंधित चिन्हे, स्थळे किंवा प्रतीकांचा वापर करण्यास स्पष्ट मनाई आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना प्रचारासाठी सादर करण्यात येणार्या जाहिराती, संदेश आणि प्रचारगीतांचे पूर्वप्रमाणीकरण बंधनकारक आहे. त्यामध्ये आचारसंहितेचा भंग आढळल्यास आयोगाकडून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातात.
यावर आयोगाला भगव्याचे वावडे का? असा सवाल करत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर लिहिले की, धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा.कुणी हिरव्या रानात अशी ओळ केली असती तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असता का? मग भगवा शब्द वापरला म्हणून भाजपाचे प्रचारगीताला परवानगी का नाकारली? श्रीराम या शब्दालाही आक्षेप घेण्यात आला आहे. भगवा व श्रीराम या देशाची ओळख आहे , ती कुणाचा कॉपीराईट नाही. उबाठासह इतर पक्षांना भगवा व श्रीरामाचे वावडे आहे , त्याला आम्ही काय करणार?
हे देखील वाचा –
रिकाम्या रस्त्यांवर गुलाबी कार; अजित पवारांना पुणे शहराचा सुन्न प्रतिसाद!
पुण्याला स्मार्ट शहर बनविण्याचे भाजपाचे वचन; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा
भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाची अडीच तास सुनावणी









