Nashik Municipal Election : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक चित्र पाहायला मिळाले. गेल्या २० वर्षांपासून राजकीय प्रवासात एकमेकांपासून लांब असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पहिली संयुक्त जाहीर सभा घेतली.
तपोवनाच्या पवित्र भूमीत पार पडलेल्या या सभेने केवळ नाशिकचेच नव्हे, तर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही नेत्यांनी यावेळी नाशिक मनपासाठी आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ‘दोन भाऊ’ एकत्र आल्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर
सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकाच मंचावर असण्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो, तेव्हा आम्हाला ‘एकत्र का येत नाही’ म्हणून विचारले जायचे. आता आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, तर ‘का आलात’ म्हणून विचारले जात आहे.”
विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, आमच्या एकत्र येण्याची कोणीही चिंता करू नये. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये त्यांच्या सत्ताकाळात केलेली विकासकामे आणि शिवसेनेने मुंबईत राबवलेले प्रकल्प यांचा संगम झाल्यास नाशिकचा कायापालट निश्चित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘चुनावी हिंदुत्वा’वरून भाजपवर कडाडून प्रहार
या सभेचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर केलेली टीका. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा मांडताना त्यांनी भाजपला धारेवर धरले. “एकीकडे राम मंदिराचा डंका पिटायचा आणि दुसरीकडे प्रभू रामचंद्र जिथे तपस्येला बसले होते, त्या तपोवनातील झाडे कापायची, हा कसला प्रकार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित असून ते ‘चुनावी हिंदुत्व’ आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजप लोकांना ‘अंधभक्त’ बनवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पक्ष सोडून जाणाऱ्यांवर आणि महायुतीवर निशाणा
नाशिकमधील काही माजी नेत्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. “भाजप हा आता उपटसुभांचा पक्ष झाला आहे. ज्यांच्यावर कालपर्यंत गंभीर आरोप केले, त्यांनाच आज तुम्ही पक्षात घेताय,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनीही भाजपवर टीका करताना सांगितले की, सत्तेचा गैरवापर करून अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी केल्या जात आहेत, जे लोकशाहीसाठी घातक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याचे दिलेले आश्वासन कसे हवेत विरले, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
नाशिकच्या विकासाचा नवा संकल्प
दोन्ही नेत्यांनी नाशिककरांना आवाहन केले की, केवळ भूलथापांना बळी न पडता शहराच्या शाश्वत विकासासाठी ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहावे. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, केवळ १५०० रुपयांनी बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न सुटणार नाही. नाशिकला खऱ्या अर्थाने ‘आयटी हब’ आणि ‘लॉजिस्टिक्स हब’ बनवण्यासाठी या दोन शक्ती एकत्र आल्याचा दावा त्यांनी केला. या संयुक्त सभेमुळे नाशिकच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली असून १५ जानेवारीच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









