Uddhav Thackeray MLC Term: महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील आमदारकी १३ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर ते पुन्हा वरिष्ठ सभागृहात जाणार का, यावरून आता चर्चेला उधाण आले आहे.
मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आणि विधानसभेतील संख्याबळाच्या गणितामुळे ठाकरे यांच्यापुढील वाटचाल काहीशी कठीण मानली जात आहे.
काय आहे संख्याबळाचे गणित?
विधान परिषदेची निवडणूक ही पूर्णपणे आमदारांच्या मतांवरअवलंबून असते. सध्याच्या परिस्थितीत महायुतीकडे २३५ हून अधिक आमदारांचे भक्कम पाठबळ आहे, ज्यामुळे त्यांचे ७ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे केवळ ४८ ते ५० आमदारांची साथ आहे. या गणितानुसार, ९ पैकी केवळ एकच जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. आता ही एकमेव जागा उद्धव ठाकरे स्वतःकडे ठेवणार की पक्षातील अन्य निष्ठावंताला संधी देणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.
उदय सामंत यांचा टोला
या संपूर्ण प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. सामंत म्हणाले की, “निवडणूक ही आकड्यांच्या जोरावर लढवली जाते. आमच्याकडे २३७ आमदारांची ताकद आहे, तर विरोधकांकडे किती संख्याबळ आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण निवडणुकीचे धाडस करणार नाही याची मला खात्री आहे.” सामंत यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
ठाकरेंसाठी ‘प्लॅन बी’ काय?
उद्धव ठाकरे यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल, तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मित्रपक्षांच्या मतांवर अवलंबून राहावे लागेल. जर ठाकरे गटाने भविष्यातील राज्यसभा किंवा इतर निवडणुकांमध्ये मित्रपक्षांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर बदल्यात मित्रपक्ष ठाकरे यांच्यासाठी आपली मते वळवू शकतात. मात्र, यासाठी महाविकास आघाडीत एकमत होणे अत्यंत गरजेचे आहे.
येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील, परंतु त्याआधीच उदय सामंत यांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.








