Dadar Kabutarkhana- मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरलेला जैन समाज या विषयावर मागे हटायला तयार नाही. जैन मुनी नीलेशचंद्र विजय हे या मुद्यावरून उद्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. त्यांनी सरकार आणि महापालिकेला थेट आव्हान देत म्हटले आहे की, दादरचा कबुतरखाना (Dadar Kabutarkhana)हाच मुख्य कबुतरखाना आहे. सरकार आम्हाला लॉलिपॉप देते आहे. पण आम्हाला नवीन कबुतरखाना नको. आम्ही आमचा कबुतरखाना उघडूनच राहणार. ‘मरते दम तक वो हम खोलके रहेंगे’. मुनी नीलेशचंद्र यांच्या या धमकीमुळे खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कबुतरखाने बंद केल्यानंतर मुंबई महापालिकेने आता चार नवीन ठिकाणी कबुतरांना नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दादरचा कबुतरखाना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय जैन समाजाला मान्य नाही. मुनी नीलेशचंद्र म्हणाले की, हा निर्णय जैन समाजाच्या भावनांना धक्का देणारा आहे. त्याविरोधात उद्या मी आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. मला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मी जीवदयेसाठी उपोषणावर ठाम आहे. सरकारवर आमचा विश्वास आहे. मात्र मागील काही दिवसातील घटना पाहता चिंतन करावे लागेल. न्यायालयाचा आदेश असला तरी त्यांनी सरकारला मार्ग काढण्यासाठीही सांगितले आहे. मात्र तरीही तोडगा काढला जात नाही. फक्त जैन समाजच नाही, तर प्रत्येक समाजातील लोक कबुतरांना दाणे टाकतात. या प्रश्नाकडे धार्मिक नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. सरकार आम्हाला लॉलिपॉप देत आहे. परंतु नवीन कबुतरखाने हा उपाय नाही. नवीन कबुतरखाने तुम्ही का देता? आम्हाला आमचे जुने कबुतरखाने पाहिजेत. आम्ही आमच्या परंपरेशी तडजोड करणार नाही. दादरच्या कबुतरखान्याची ताडपत्री आम्ही स्वतः काढून टाकू.
मुनी नीलेशचंद्र यांच्या या ईशार्यानंतर दादर परिसरात पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. आझाद मैदानावरील उपोषणादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घेतली जात आहे. जैन समाजाच्या आग्रहामुळे वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशांनुसार कबुतरांना नियंत्रित खाद्य टाकण्यासाठी मुंबईत चार ठिकाणे निवडली आहेत. यात वरळी जलाशय, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, ऐरोली-मुलुंड जकात नाका आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान या ठिकाणांचा यात समावेश आहे. या ठिकाणी केवळ सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे टाकता येतील. स्वयंसेवी संस्थांना या ठिकाणांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था सुरू राहील, असे महापालिकेने म्हटले आहे. मात्र, यातील काही ठिकाणांना पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. आता जैन धर्मीयांनीही नवी ठिकाणे अमान्य केली आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
आयोगाआधीच वळसे पाटलांकडून संभाव्य निवडणूक तारखा जाहीर
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वाद









