Ramdas athawale- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांत फोडाफोडी आणि जागावाटपावरून कटुता वाढत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले (Ramdas athawale) यांनीही निवडणुकीत महत्त्व न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागत आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, आरपीआय स्वबळावर निवडणुका लढवणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
रामदास आठवले म्हणाले की, इतर पक्ष निवडणुका आल्या की, सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात. पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनवण्या कराव्या लागतात. आम्हीही देशाच्या राजकारणात आहोत. आम्हालाही लढायचे आहे, पण आमच्याकडे मजबूत संघटन नसल्याने पक्षाला इतर पक्षांकडे भीक मागण्याची वेळ येते. मतांची गरज असते, तेव्हा आमची आठवण येते. पण जागा देताना आम्हाला महत्त्व दिले जात नाही. ही परिस्थिती बदलायला हवी.
ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत 17 ते 18, तर पुणे महापालिकेत 20 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 8 ते 9 जागा मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. महायुतीच्या विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. पुणे महापालिकेसाठी 20 प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून, ती भाजपाकडे सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे.
समाधानकारक जागा न मिळाल्यास इतर पक्षांशी युती करण्याची शक्यताही आठवलेंनी बोलून दाखवली. ते म्हणाले की, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघेही सत्तेत एकत्र आहेत. मात्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत ते आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाने युतीबाबत निर्णय घेतला आणि आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या तर आम्ही महायुतीसोबतच राहू. समाधानकारक जागा न मिळाल्यास शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी हे आमच्यासमोर पर्याय आहेत. मात्र, शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांत युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरीदेखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल, अशी वक्तव्ये घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून’एसआयआर’वरून गोंधळाचे संकेत









