कामगार विमा रुग्णालयातील कर्मचारी ६ महिने पगाराविना

Workers Insurance Hospital

मुंबई – कांदिवली येथील राज्य कामगार विमा (Insurance)रुग्णालयातील १७० कंत्राटी कर्मचार्‍यांना (Contract employee) गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही कामगारांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप कंत्राटी कामगारांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य कामगार विमा योजनेच्या महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयात (hospital) विविध पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली, मुलुंड, वरळी आणि उल्हासनगर येथील रुग्णालयातही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. यात Nurse ,Lab Technician, Clerk, शिपाई यांचा समावेश आहे. या रुग्णालयांपैकी कांदिवली येथील रुग्णालयात काम करणाऱ्या १७० कर्मचार्‍यांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधीच्या कंत्राटदारांचे कंत्राट जानेवारी महिन्यात संपुष्टात आले असून नवीन कंत्राटदाराच्या कंपनीत हे १७० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. तरी प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचे तातडीने पगार द्यावेत, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.