बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी चांगली वागणूक दिली नाही!! भरत गोगावले यांचा आरोप


मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कामाची जी पद्धत होती ती उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला दिसली नाही. बाळासाहेबांनंतर त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली नाही. पडद्यामागून रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप होता, असा आरोप शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीका होत आहे.
भरत गोगावले म्हणाले की, मी माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मी खाली बसलो होतो त्यांनी मला त्यांच्या बाजूला बसायला सांगितले. खुर्ची देणाराही मी आहे आणि घेणाराही मी आहे. ती आपुलकी तेव्हा होती. पण बाळासाहेब गेल्यानंतर जो काही कारभार झाला तो आम्हाला आवडला नाही. या घडामोडींमागे रश्मी ठाकरे आणि त्यांचे काही नातेवाईक होते. आम्ही सांगितले की, महिलेने किती हस्तक्षेप करावा याला काही मर्यादा असते. मनात इच्छा असूनही उद्धव ठाकरे काही करू शकले नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यांना भेटायला गेलो तर आम्हाला परत पाठवायचे. वहिनी पडद्यामागून बराचसा हस्तक्षेप करत होत्या. मविआत जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले असते तर फार वेगळे चित्र दिसले असते. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले.
यावर उबाठाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, भरत गोगावले यांच्या बुद्धीची कीव येत आहे. त्यांचे वक्तव्य अधोगतीकडे जाणार आहे. मीनाताई ठाकरे यांची भूमिका आता रश्मी ठाकरे पार पाडत आहेत. आपले लोक निवडूण आल्यानंतर त्या आरती करतात. ठाकरे घराण्याची परंपरा त्या चालवत आहेत.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला कल्पना नाही भरत गोगावले नक्की काय बोलले. तसेही शिवसेना सोडून मला 35 वर्षे झाली आहेत. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे निर्णय घेत होते. आता शिवसेनेत कोण निर्णय घेते हे मला माहीत नाही. शिंदे गट हा शिवसेनेतून फुटल्यापासून ते सतत उबाठाच्या नेत्यांवर फुटीबाबत आरोप करीत आहेत. शिंदे गटावर सुरुवातीला ‌‘पन्नास खोके, एकदम ओके‌’ अशी टीका झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर आरोप सुरू केले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा आरोप झाला. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले. आता ते रश्मी ठाकरेंवर आरोप करीत आहेत.