महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग! राहुल गांधींचा भाजपावर नवा आरोप


मुंबई- महाराष्ट्राच्या 2024 निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज बिहारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहेत. बिहारमध्ये आल्यावर राहुल गांधी यांनी एक एक्स पोस्ट करत नवा आरोप केला की, महाराष्ट्रानंतर भाजपा बिहारमध्येही मॅच फिक्सिंग करेल. जिथे जिथे भाजपा हरण्याची शक्यता असेल, तिथे तिथे अशा प्रकारे मॅच फिक्सिंग केले जाईल. राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपाने, त्यांनी बिहारमधील निवडणुकीतील पराभव आधीच मान्य केला आहे, असा पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे. हा निवडणूक चोरीचा प्रकार आहे. 2024 ची महाराष्ट्रातील निवडणूक लोकशाहीच्या गैरप्रकाराची ब्लूप्रिंट आहे. टप्प्याटप्प्याने हे षड्यंत्र रचण्यात आले. यातील पहिला मुद्दा, निवडणूक आयोगाच्या पॅनलच्या नियुक्तीत हेराफेरी करण्यात आली. दुसरा मुद्दा म्हणजे मतदार याद्यांत बोगस नावे घुसडण्यात आली. तिसरा मुद्दा असा की, मतदानाचे प्रमाण वाढवून सांगण्यात आले. चौथा मुद्दा, भाजपाला ज्या ठिकाणी विजय मिळवायचा होता त्या ठिकाणी ठरवून बोगस मतदानाचा प्रयोग केला. पाचवा मुद्दा सांगायचा तर, हे सर्व केल्यानंतर सर्व पुरावे लपवले. महाराष्ट्रात भाजपा इतका हताश का होता हे समजणे कठीण नाही. पण मॅच फिक्सिंगने त्यांनी निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली तीच बिहारमध्ये होईल. कारण भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो. जिथेजिथे भाजपा हरत असेल तिथे तिथे मॅच फिक्सिंग होईल.
राहुल गांधी यांनी असेही म्हटले की, फसवणूक करणारा पक्ष जिंकू शकतो, पण संस्थांचे नुकसान होते. लोकांचा निकालावरील विश्वास उडतो. सर्व संबंधित भारतीयांनी हे पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःच न्याय करावा, उत्तरे मागावी. मॅच फिक्स निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी विष आहेत.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजपाने जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, जॉर्ज सोरोस यांच्या पुस्तकातून थेट उचलेलला हा दावा आहे. लोकांच्या मनात आपल्याच देशांच्या यंत्रणाविषयी संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रकार आहे. आपल्या देशातील निवडणूक यंत्रणा कशी काम करते, हे राहुल गांधी यांना ठाऊक नाही, असे नाही. परंतु त्यांना अराजकता माजवायची आहे. त्यामुळेच ते मतदारांच्या मनात जाणूनबुजून देशातील संशय निर्माण करण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राहुल गांधी काय बोलतात, रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत असावे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी ते सातत्याने बोलतात. हा आरोप त्यांनी यापूर्वीही केला आहे, तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना यापूर्वीच्या निवडणूक काळात किती मतदार वाढले होते, आता किती वाढले हे सप्रमाण दाखवून दिले. तरीही त्यांना रोज खोटे बोलायची सवय लागली आहे. कारण ते स्वतःच्या मनाला समजवताहेत. ते सत्य स्वीकारणार नाहीत, जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य नाही. महाराष्ट्रातील जनतेचा, लाडक्या बहिणींचा अपमान ते करताहेत. बिहारमधील निवडणुकीतील पराभव त्यांनी आधीच मान्य केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणत निवडणूक आयोगावर निशाणा साधत म्हटले की, हा मुद्दा आम्ही यापूर्वीही अनेकदा उपस्थित केलेला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेमध्येही तो आपल्या भाषणात उपस्थित केला आहे. बोगस नावांची यादी आम्ही निवडणूक आयोगाला देऊन ती रद्द करायला सांगितली. पण त्यांनी तसे केले नाही. बोगस नावे तीनवेळा नोंदवली गेली. त्यामुळे एका मतदाराला तीन वेळा मतदान करता आले. निवडणूक आयोगाने ही नावे हटवायला पाहिजे होती. त्यांची ही जबाबदारी होती. तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेसने याआधीच निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आम्ही उत्तराची वाटत पाहत आहोत.
निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप फेटाळले. निवडणूक आयोगाने असा खुलासा केला की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी, मतदानाची प्रक्रिया व मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा, निवडणूक नोंदणी नियम या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. निवडणुकीसाठीचे उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या एजंटच्या उपस्थितीत मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अधिकृत एजंटनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर तसेच निवडणूक निरीक्षकांकडे कोणतीही तक्रार केली नव्हती.