अशोक ‘डिलर’ चव्हाण अखेर भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले

मुंबई – आदर्श सोसायटी बनवून शहिदांच्या कुटुंबाला धोका देणारे, नांदेडचे ‘लिडर’ नव्हे ‘डिलर’ अशी विशेषणे ज्या भाजपाने त्यांना लावली त्या भाजपात जाण्यासाठी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन आज नांदेडचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री, शंकरराव चव्हाणांचे पुत्र भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये प्रवेशासाठी सज्ज झाले. निवडणुकीपूर्वी ते काँग्रेस पक्ष सोडणार हे खूप आधीच ठरले होते. आज अखेर त्यांनी काँग्रेस पक्ष आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसचा हात सोडला. ते काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. राज्यातील भाजपाच्या नेत्यांनीही अनेकदा उघडपणे तसे बोलून दाखवले होते. या अफवा नव्हत्या हे आज सकाळी साडेअकरा वाजता स्पष्ट झाले. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला
रवाना झाले.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर आता अशोक चव्हाण 15 फेब्रुवारीला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपाप्रवेश होणार आहे. भाजपामध्ये गेल्यावर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी किंवा केंद्रातही मोठे पद दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, अशोक चव्हाण यांच्यावर भाजपानेच अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका करताना म्हटले होते की, महाराष्ट्रात काही लोकांनी एक आदर्श सोसायटी बनवण्याची घोषणा केली होती. शहिदांच्या कुटुंबाच्या नावाने त्यांनी फसवणूक केली. हे नांदेडच नव्हे, तर पूर्ण भारताला पूरेपूर ठाऊक आहे. ते कोण आहेत हे तुम्हालाही ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाणांबद्दल म्हणाले होते की, अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवले, मुख्यमंत्री बनवले, इतके वेळा संधी दिली, पण या नांदेड शहराचा, जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? विकास करू शकले का? नाही. कारण ते लीडर नाहीत, तर डिलर आहेत. रॉकेलपासून पेट्रोल पंपापर्यंत, मोटारसायकलपासून मोटारगाड्यांपर्यंत सगळीकडे डिलरशिप त्यांचीच आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर मुंबईतील आदर्श सोसायटीचे अर्धा डझन फ्लॅट आपल्या नातलगांना दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात सीबीआय कारवाईची मागणी केली होती. या तिघांच्या भाषणांचे व्हिडिओ आज व्हायरल झाले होते. भाजपाकडून इतके आरोप झालेले अशोक चव्हाण आता भाजपात जाऊन स्वच्छ होणार आहेत. भाजपात जाण्यासाठी अशोक चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. त्यात केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात त्यांचा वाजतगाजत प्रवेश होईल.
राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण दुपारी आपल्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आज विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा आणि विधिमंडळ काँग्रेसच्या सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी प्रामाणिकपणे काम केले. माझी कोणाही विरुद्ध तक्रार किंवा वेगळी भावना नाही. पक्षांतर्गत गोष्टींची जाहीर वाच्यता किंवा उणीदुणी काढण्याचा माझा स्वभाव नाही. काँग्रेसने मला मोठे केले, तसे मीही काँग्रेसला मोठे केले. पक्षाचा राजीनामा देणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. याबाबत मी कोणत्याही आमदारांशी, सहकार्‍यांशी चर्चा केली नाही. काँग्रेस सोडण्याचे कारण काय, असे विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचे कारण असलेच पाहिजे असे नाही. मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो. त्यामुळे आता वेगळा विचार करायची वेळ आली आहे, असे वाटते. काँग्रेस सोडल्यावर मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. यासाठी मला वेळ हवा. माझी पुढची वाटचाल मी दोन दिवसांनंतरच स्पष्ट करीन.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीतील सगळेच प्रमुख नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष गेले काही वर्षे ज्याप्रकारे वाटचाल करत आहे, त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होते आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढेच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे मजबूर केले गेले, हे समजत नाही. मात्र, काँग्रेस मजबुतीने भाजपाचा सामना करणार आहे. अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख झाले आहे. पक्षाने त्यांना मोठमोठ्या पदावर संधी दिली होती. परंतु सध्या भाजपाकडून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, त्यावरून त्यांच्यावर कोणता दबाव होता का, हे स्पष्ट होईल. अशोक चव्हाण पक्ष सोडून गेलेले असले तरी त्यांच्यासोबत इतर कुणी आमदार, पदाधिकारी जाणार नाहीत. भाजपाकडून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. उद्या आम्ही आमदारांची बैठक बोलावली असून सगळे मुंबईत येत आहेत.
आतापर्यंत काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते
नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, प्रशांत ठाकूर, रवीशेठ ठाकूर, अमरिश पटेल, नीतेश राणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top