मुंबई – सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला आहे. परंतु अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला नाही . त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात बिद्रे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे म्हणाले की, पनवेल सत्र न्यायालयाच्या निकालाआधारे नवी मुंबई पोलीस आयुक्त, पनवेल आणि मिरा-भाईंदर महापालिका, हातकणंगले नगरपंचायत तसेच मिरा-भाईंदर तहसीलदार यांच्याकडे मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केला. मात्र सर्वच कार्यालयांनी जबाबदारी झटकली. अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला हा माझ्या मुलीच्या शैक्षणिक व कायदेशीर गरजांसाठी अत्यंत आवश्यक आहे. हत्या होऊन नऊ वर्षे उलटली असून मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तरी सुद्धा आम्हाला मृत्यूचा दाखला मिळत नाही. त्यामुळे उन्हाळी सुटीनंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करणार आहे.