आंबोलीतील केबल कामाप्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी

*पावसाळ्यात घाट पुन्हा
कोसळण्याची भीती

सावंतवाडी- तालुक्यातील आंबोली घाटात दरीच्या बाजूने एअरटेल कंपनीचे मोबाईल केबल टाकण्याचे सुरू असलेले काम थांबविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम अधिकारी विजय चव्हाण यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या होत्या. मात्र ते न थांबविल्याने संबंधित कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, या ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे हा घाट पावसाळ्यात पुन्हा कोसळण्याची भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

चव्हाण यांनी म्हटले आहे की, आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याला लागून खासगी केबल टाकून काँक्रीटीकरण होत आहे. मात्र, कठड्याच्या मोरीमध्ये दरीच्या बाजूने पाणी खाली जाण्यासाठी मार्ग ठेवला नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यात पाणी साठून कठडा कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकारी चव्हाण यांना कल्पना देण्यात आली होती. बांधकाम अधिकारी चव्हाण यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व संबंधित ठेकेदारास काम बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तरीही त्याने घाटात काम सुरू ठेवले होते. त्यामुळे या कामाची तात्काळ पाहणी करुन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा आंबोली ग्रामस्थांच्यावतीने चव्हाण यांनी दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top