पाटणा- बिहारमध्ये जात सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी मांडणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता ओबीसी आणि दलित मतांवर जोर दिला आहे. त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘चाय पे चर्चा ‘ च्या धर्तीवर राज्यभरात ‘कर्पूरी चर्चा’ कार्यक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री, जननायक कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न दिलेला नाही. त्यामुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यासाठीच त्यांनी ‘कर्पूरी चर्चा ‘ मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.या मोहिमेंतर्गत राज्यात सात पथके तयार केली आहेत.या पथकांचे नेतृत्व पक्षाचे उत्कृष्ट वक्ते म्हणून ओळखणारे नेते करणार आहेत.जात सर्वेक्षणाचा अहवाल कसा गरजेचा आहे याबाबत लोकांना माहिती देऊन हे नेते त्याबाबत जनजागृती करणार आहेत. त्याचप्रमाणे दलितांना आकर्षित करण्यासाठी राज्यभरात ‘भीम संसद’ यात्रा काढली जाणार आहे. एकंदर ओबीसी आणि दलित मतदारांना पक्षाकडे ओढण्यासाठी तसेच पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठी ही चर्चा आणि यात्रा काढली जात आहे.या कार्यक्रमाचे संयोजक आमदार रवींद्र सिंह यांनी सांगितले की,राज्यात आतापर्यंत ६३ विधानसभा मतदारसंघात अशाप्रकारची चर्चा आयोजित करण्यात आली होती.येत्या २४ ऑक्टोबर रोजी कर्पूरी ठाकूर यांच्या होणार्या जन्मशताब्दीआधी राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघात भव्यदिव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
आता केंद्र सरकार विरोधात नितीशकुमारांची ‘कर्पूरी चर्चा’
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/10/ac3bb8d1-4607-4ab5-a3f7-5a6cbe26e101-1024x528.jpg)