लखनऊ – ऐन सणासुदीच्या काळात उत्तर प्रदेशातील विजेचे संकट तीव्र बनत चालले आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे आणि वार्षिक देखभालीमध्ये कुचराई झाल्याने अनेक वीजिनर्मिती युनिट्स बंद पडली आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वीज निर्मितीमध्ये सुमारे २५०० ते ३००० मेगावॅटची घट झाली आहे.
वीजतुटवडा असल्याने राज्यातील अनेक गावे आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक गावांमध्ये पाच ते आठ तास वीजपुरवठा खंडित होत आहे,तर मोठ्या शहरांमध्ये पुरवठा अनियमित आहे. ऊर्जा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, राज्यातील सहा पॉवर प्लांट या आठवड्यात वार्षिक देखभालीसाठी आणि अनेक तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत. यूपी पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने यापैकी चार युनिट्सची दुरुस्ती केली असली तरी बारा आणि तांडा पॉवर प्लांटसह १२ हून अधिक युनिटमध्ये उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकलेले नाही.
राज्याचे ऊर्जामंत्री ए. के. शर्मा यांनी मान्य केले आहे की, सिक्कीममधील पुरामुळे तसेच काही युनिट्सची देखभाल न झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.१८ ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा मंत्री शर्मा यांनी व्यक्त केली आहे.