मुंबई:
मुंबईतून लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील जातात. या वर्षी गणपतीचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे १२० दिवस आधीच चाकरमान्यांना गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे. येत्या १६ मेपासून रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे. गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तिकिटे संपतात असा अनुभव कोकणवायीसांयाचा आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कोकणकन्या, राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी, तेजस एक्प्रेस अशा गाड्यांचे आरक्षणावर चाकरमान्यांचा जोर असणार आहे.
दरम्यान, शाळांना सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने कोकणात नागरिक गावी जात असतात. उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविंम (गोवा) दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवत आहे. मध्य रेल्वेने याआधीच 916 उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली होती. या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या 942 होईल. 26 विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहे. या सर्व गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील. या गाड्यांचे बुकिंग irctc.co.in/nget/train-search वर करता येईल.