मुंबई- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक, पर्यटनस्थळ असलेल्या मुरुड-जंजिरा या किनारी किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्याविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने काल सोमवारी फेटाळून लावली. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक राजकारणी महेश मोहिते यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.
याचिकाकर्ते महेश मोहिते यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत हा किल्ला ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे या किल्ल्याजवळ जेट्टी बांधल्यास पर्यावरणाची हानी होईल आणि परिसरातील मच्छिमारांच्या जीवनमानामध्ये बाधा येईल. यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने मात्र मच्छिमारांनी कोणतीही तक्रार केली नसल्याचे नमूद केले. ज्या मच्छिमारांनी बाधित असल्याचे सांगितले जाते, त्यांनी यापूर्वीच एक सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि जर ते बाधित झाले तर ही बाब या संस्थेने संबंधित अधिका-यांसमोर मांडावी, असे खंडपीठाने म्हटले आहे.
याबाबत मच्छिमारांनी याचिका दाखल केली असती तर त्यावर विचार करता आला असता.पण त्यांनी याचिका दाखल केलेली नाही.एका राजकीय नेत्याने दाखल केलेल्या याचिकेवर आम्ही का विचार करावा,असा सवालही खंडपीठाने यावेळी केला. तसेच याचिकाकर्त्याने न्यायालयांना राजकीय व्यासपीठ मानू नये आणि राजकीय हेतूसाठी कायदेशीर प्रक्रियेचा वापर करू नये,असेही खंडपीठाने म्हटले.यावेळी खंडपीठाने ही याचिका फेटाळत यावर मच्छिमार संस्थेने कायद्यानुसार उपाययोजना करण्यास सांगितले.