पुणे- १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा बुर्जी, अंडा बिर्याणी, केळी यांचा समावेश करावा, असा शासन निर्णय महाराष्ट्र सरकराने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जारी केला होता. ५ डिसेंबर २०२३ पासून या शासनाच्या या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, शासनाचा हा निर्णय चुकीचा असून, शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करणे हे जैन आणि शाकाहारी मुलांना मांसाहारी बनविण्याचे महाराष्ट्र शासनाचे षडयंत्र आहे, असा आरोप शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केला आहे.
डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले की, ‘शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळेच शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश करून नये. मुलांना पोषण आहारात अंडी देणे हे अत्यंत चुकीचे आहे. या निर्णयाचा परिणाम शाळेतील जैन, महानुभव पंथी, ब्राह्मण व अन्य शाकाहारी विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना अंड्यांच्या पदार्थांचे सेवन करताना बघून जैन, महानुभव पंथी, ब्राह्मण व अन्य शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील ते पदार्थ खाण्याची इच्छा होईल. अशा प्रकारे त्यांना या गोष्टींचे सेवन करण्याची सवय होऊ शकते. शाळेतील जैन आणि शाकाहारी मुलांना मांसाहारी बनविण्याचे हे शासनाचे षडयंत्र आहे. आपला धर्म वाचवायचा असेल, तर सर्व लोकांनी एकत्र येत शासनाच्या या निर्णयाचा विरोध करणे गरजेचे आहे. शासनाच्या या निर्णयामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र त्यांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनविणे योग्य आहे का? अंड्यांमध्ये कोणत्याही पोषक घटकांचा समावेश नाही. अंड्यामध्ये प्रोटिन्सची मात्रा कमी असून कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात आढळते. अंड्यांचे सेवन करताना ती शिळी की ताजी, याचीही आपल्याला माहिती नसते. अंड्यांचे सेवन केल्यामुळे टायफॉईडचा ताप, ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड यासांरख्या अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. शासनाच्या या निर्णयाचा पालक आणि शालेने गांभीर्याने विचार केला पाहिजे.’