धारावीत पुनर्वसनासाठी पहिल्याच दिवशी ५० झोपड्यांचे सर्वेक्षण

*घरोघरी पाहणी पथक दाखल

मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये अदानी कंपनीकडून घरोघर सर्वेक्षण सुरू झाले आहे.काल पहिल्याच दिवशी कमला रमण नगर येथील ५० झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.साक्षी सावंत या रहिवासी महिलेच्या सदनिकेपासून काल सर्वेक्षणाला सुरूवात झाली.

१८ मार्च रोजी धारावीत अदानी कंपनीकडून प्रत्येक झोपडीला युनिक नंबर देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.त्यानंतर लेन्सचा वापर करून झोपडीचे लेसर मॅपिंग केले होते.याला लायडर सर्वेक्षण असे म्हटले जाते. सर्वेक्षण कामासाठी प्रत्येकी पाच सदस्यीय पाच पथके तयार केली आहेत.ही पथके झोपडीधारक आणि दुकानदाराच्या दुकानांना भेट देत आहेत.घरोघर सर्वेक्षण जलदगतीने होण्यासाठी लवकरच पथकांची संख्या वाढवली जाणार आहे.या पथकाकडून रहिवाशांकडे असलेली सर्वात जुने तसेच ताज्या महिन्याचे वीज बिल, मतदार ओळखपत्र,मतदार यादीची प्रत,गुमास्ता परवाना आणि महापालिकेने दिलेला हॉटेल परवाना यासारख्या कागदपत्रांच्या स्व:साक्षांकित छायाप्रती गोळा केल्या जात आहेत.मूळ कागदपत्रे पथकाकडून जागेवरच स्कॅन करून सदनिकाधारकांना परत दिली जात आहेत.

त्याचप्रमाणे सदनिकाधारकांच्या छायाचित्रांसह,त्यांच्या कौटुंबिक छायाचित्रांचेही संकलन करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शैक्षणिक पार्श्वभूमी,कुटुंबात किती सदस्य कमावते आहेत, एकूण कौटुंबिक उत्पन्न किती आहे,ते सध्याच्या सदनिकेत किती काळापासून राहत आहेत, त्यांची मातृभाषा कोणती, त्यांचे मूळ गाव कोणते, त्यांना धारावीत नोकरी आहे की ते धारावीबाहेर काम करतात?,नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात की खाजगी वाहनाने जातात? इत्यादी प्रश्न धारावीकरांना विचारण्यात येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top