लखनऊ- लखनऊ शहरात काल बुधवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांनी काल दिवंगत नेते जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी चक्क बंद गेटवर चढून आत उडी घेतली.यावेळी पोलीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीकाळ झटापट दिसून आली.
अखिलेश यादव हे आपल्या कार्यकर्त्यांसह जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय सेंटरमध्ये दिवंगत जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी गेले होते.मात्र टाळे लावून या सेंटरचे गेट बंद करण्यात आले होते.यादव यांना आत जाण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती.त्यामुळे अखेर यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः बंद गेटवर चढून आत उडी मारली आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.हा प्रकार घडत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीकाळ मोठी झटापट झाली. या नाट्यमय घडामोडीनंतर अखिलेश यादव म्हणाले की,जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय सेंटरमध्ये मला प्रवेश नाकारताना पोलीस बळाचा वापर करण्यात आला.ही दुर्दैवी घटना आहे. सरकार या ठिकाणी प्रवेश नाकारून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे यातून सरकार आपले कोणते अपयश झाकत आहे?
दुसरीकडे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी अखिलेश यादव यांच्यावर खोचक टीका केली आहे. पाठक म्हणाले की, समाजवादी पक्ष हा मुळातच गुंडगिरीसाठी ओळखला जातो. त्यात काही नवीन नाही.पण हा दिवस अशी बंद गेटवरून उडी मारण्याचा नाही.त्यांनी हे कौशल्य नुकत्याच झालेल्या ऑलिंपिकमध्ये दाखवले असते तर बरे झाले असते.
पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अखिलेश यादवांची गेटवरून उडी
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/10/7d4ef5e9-359e-47a8-ae37-275f2d15d1b7-1024x575.jpg)