पालघर- पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे ‘शिट्टी’ हे चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जनता दल ( युनायटेड ) या पक्षासाठी राखीव ठेवले होते. त्यामुळे बविआला या निवडणूकीत हे चिन्ह वापरता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर बविआने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे. बहुजन विकास आघाडीला ‘शिट्टी’ चिन्ह वापरता येईल, असे आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. त्यामुळे बविआच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार असून बविआचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
