अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसणार असे बोलले जात आहे.
सध्या भाजपामध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त असून तिकीट वाटप पाहत त्यांचेच वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नगर दक्षिण मतदार संघातील शेवगाव येथील भाजपाचे पदाधिकारी सुनील रामचंद्र रासने यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडून आल्यानंतर शेगावच्या नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष दिले नाही. यांनी मतदारसंघात ढुंकुण देखील पाहिले नाही. नागरिकांचे फोन न उचलणे, पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे. त्यामुळेच आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करत आहेत. परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती असा खोचक टोला रासने आणि सुजय विखे पाटील यांना लगावला आहे. विशेष म्हणजे रासने सध्या भाजपाचे सरचिटणीस असून त्यांनी शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक महत्त्वाचे पदे भूषवली आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.