सावंतवाडी- मागील काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, सोनुर्लीसह मडूरा भागात गवा रेड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. हा कळप झाडावरील लोंबकळणारे आंबे आणि चक्क काजूच्या झाडावरील सहा फुटांपर्यंतची काजू फळे फस्त करत आहे.त्यामुळे या गव्यांच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी बागायतदार मंडळींनी वनविभागाकडे केली आहे.
वायंगणी भातशेती आणि उन्हाळी भाजीपाल्याआधी सध्या गवा रेड्यांचा कळप आंबा,काजू फळांना आपले लक्ष्य करताना दिसत आहे. हा कळप ही फळे खात आहे, तसेच या झाडांच्या फांद्या मोडून कलमांची नासधूस करत आहे. या गवा रेड्यांच्या भीतीमुळे या बागायतीत कामे करण्यासाठी कामगारही मिळेनासे झाले आहेत. वनविभागाने या गवा रेड्यांच्या कळपाचा येत्या दोन दिवसांत बंदोबस्त केला नाही तर सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी आणि बागायतदारांच्या वतीने सोनुर्ली येथील बागायतदार विलास नाईक आणि श्रीहरी नाईक यांनी दिला आहे.