अमरावती
राम मंदिर सोहळ्यानिमित्त अमरावतीहून ५०० किलो कुंकू अयोध्येला पाठवले जाणार आहे. कुंकू तयार करणारे शहर म्हणून अमरावतीची खास ओळख आहे. अमरावतीमधील ‘सकल हिंदू समाज’ने अयोध्येला कुंकू पाठवण्याचा संकल्प केला आहे. ५०० किलो कुंकू आज अमरावतीहून अयोध्येसाठी रवाना झाले आहे. याबाबत केसरी धर्मसभेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी सांगितले की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अंबानगरीची खास ओळख असलेले ५०० किलो कुंकू पाठवणार आहोत. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू सोबत नेतील. उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येत पोहोचवतील. हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. अमरावतीत आता कुंकू तयार करणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके शिल्लक असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील कुंकवाला मोठी मागणी होती.